पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट “ब” व गट “क” या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. सदर नोकर भरती प्रकिये मध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, विरोधी पक्षनेते अजित पवार व महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाव्दारे केली आहे.
या विषयी अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा यापूर्वीच “ब” वर्गामध्ये समावेश झालेला असून पिंपरी चिंचवड महापालिका सेवा नियम २०१६ अन्वये महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी आरक्षित केलेल्या भूमिपुत्रांच्या जमिनी तसेच रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या ज्या भूमिपुत्रांचे ५०० चौ.मीटर पासून पुढील क्षेत्र संरक्षण क्षेत्राकरिता किंवा राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या आहेत. अश्या सर्व पिंपरी चिंचवड बाधितांचे वारसदारांना नव्या आकृतीबंधाद्वारे नोकरीमध्ये सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करताना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आलेले राखीव आरक्षणा व्यतिरिक्त जादा २० टक्के अतिरिक्त आरक्षण राहील असा नियम आहे असे असताना देखील आता होत असलेल्या नोकर भरतीमध्ये सदर नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. याबाबत मी महापालिका आयुक्तांना वारंवार पत्र व्यवहार देखील केला आहे.
स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या दिल्या पाहिजे असा आदेश राज्य शासनाने प्रथम १९६८ मध्ये जारी केला होता.त्यानंतर सुधारणा करीत राज्य शासनाने २५ ऑगस्ट १९७०,१३ फ़ेब्रुवारी१९७३, २ जून २००५, ३० मार्च २००७, आणि १७ नोव्हेंबर २०१९ रोजी करण्यात आला होता. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. हा स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेला मोठ्या प्रमाणावर अन्याय आहे असे मला वाटते. याकरिता स्थानिकांना नोकरीत ८० टक्के प्राधान्याचा GR चे त्वरित कायद्यात रुपांतर करण्यात येणे गरजेचे आहे. स्थानिकांना उद्योगांमध्ये प्राधान्य देण्याची तरतूद आहे परंतु शासकीय अथवा निमशासकीय नोकऱ्यांमध्ये तरतूद का नाही असा प्रश्न नागरिकामध्ये निर्माण हित आहे.
राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लघु उद्योग बंद पडलेले असून त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत,त्यामुळे शहरातील बेरोजगारांचा आलेख उंचावला आहे.त्यांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत रोजगाराचे हे प्रश्न सुटणार नाहीत.अनेक स्थानिक भूमिपुत्रांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या नोकर भरती मुळे नामी संधी चालून आलेली आहे. आपण सहकार्य केल्यास या संधीचे सोने होणार आहे.
आज शहरातील भूमिपुत्रांवर बेकारीची परिस्थिती ओढवली आहे. त्यांना १० ते १२ हजार रुपयांमध्ये खाजगी संस्थेमध्ये नोकरी स्वीकारावी लागत आहे.शहरातील स्थानिक भूमिपुत्र,नागरिक यांना प्रथम प्राधान्य देऊन आपण योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती वाघेरे यांनी केली आहे.