पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘जल्लोष शिक्षणाचा’ या उपक्रमात भोसरी येथील वैष्णोमाता प्राथमिक शाळा, इंद्रायणीनगर ही सर्वोकृष्ष्ट शाळा ठरली असून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या शाळेला १ कोटी रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उपआयुक्त विठ्ठल जोशी, संदीप खोत, रविकिरण घोडके, सहायक आयुक्त वामन नेमाणे, सिताराम बहुरे, सुचिता पानसरे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांच्यासह शहरातील महापालिका आणि खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘जल्लोष शिक्षणाचा’ या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारचा उपक्रम पुणे जिल्हा पातळीवर राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने ‘जल्लोष शिक्षणाचा’ या उपक्रमांतर्गत दि.१८ डिसेंबर ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट सिटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, हवामान आणि पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छता आदी विषयांवर अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच २४ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीत कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये घेण्यात आलेल्या आंतरशालेय स्पर्धा, गेम्स झोन, पुस्तकांचे स्टॉल, पपेट शो, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, ट्रेझर हंट या स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल कार्निव्हलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामधील सर्वोत्कृष्ट मॉडेल्स बनविणाऱ्या ५ विद्यार्थ्यांना तसेच विजेत्या आणि उपविजेत्या ठरलेल्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
दि. २६ जानेवारी २०२३ रोजी महापालिकेच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी येथील एच.ए. मैदानावर एक विशेष एरोमॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.