ठाणे (Pclive7.com):- ठाकरे गटाकडून काल ठाण्यात हिंदी भाषक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. २०२४ ची आपली संधी हुकली तर हा संपूर्ण देश नालायक आणि हुकूमशहांच्या हातात जाईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हिंदी भाषक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले, “मला विचारलं जातं की, तुम्ही सगळ्यांना सोबत का घेत आहात? तुम्ही मोदींच्या विरोधात आहात का? तर मी सांगू इच्छितो की, मी मोदी किंवा कोणत्या व्यक्तीविरोधात नाहीये. मी हुकूमशाहीच्या विरोधात नक्की आहे. भारतमातेच्या हातापायांत पुन्हा बेड्या पडताना मी बघू शकत नाही. मी माझ्या भारतमातेला कुणाचंही गुलाम बनू देणार नाही. हीच शपथ आज आपल्याला घ्यायची आहे.”

“आधी आपल्या भारतात बाहेरच्या देशातून मुघल यायचे. बाबरही बाहेरच्या देशातून आला होता. त्यामुळेच तर आपण बाबरी मशीद पाडली. त्यानंतर इंग्रज आले. ते १५० वर्षे राज्य करून गेले. इंग्रजांशी लढताना आपल्या अनेक पिढ्या मरण पावल्या. पण आपण लढत राहिलो. शेवटी तो दिवस उजडलाच आणि इंग्रजांनाही आपला देश सोडून जावं लागलं. आता आपल्या घरातलेच आपल्या डोक्यावर बसू पाहत आहेत. पण कुणीही असलं तरी गुलामी ही गुलामीच असते. त्यामुळे मी माझ्या भारतमातेला पुन्हा गुलाम बनू देऊ इच्छित नाहीये,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
नरेंद्र मोदींचा अप्रत्यक्ष उल्लेख करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “तुम्ही गुलाम बनून विकासाचं स्वप्न पाहू शकता का? ते उठ म्हटले तर उठावं लागेल, ते बस म्हटले तर बसावं लागेल. हा विकास तुम्हाला मंजूर आहे का? आज आपला देश अशा वळणावर आला आहे. २०२४ ची संधी हुकली तर रेल्वे सुटली असंच समजावं लागेल. त्यानंतर आपला देश आपल्या हातून निसटून जाईल. मग हा देश या नालायक लोकांच्या हातात जाईल. या हुकूमशहांच्या हातात जाईल. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे, तुम्ही सगळे एकत्र आला आहात आणि एकत्रच राहालं.”






















Join Our Whatsapp Group