पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही तासापासून पवना धरण क्षेत्रात पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाले आहे. दरम्यान पवना धरण १०० टक्के भरले असून आज (दि.०८) दुपारी २ वाजता धरणातून ५६०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.
प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पवना धरणाच्या विज निर्मीती ग्रूहाद्वारे १४०० क्यूसेक्स व सांडव्यावरून २१०० क्यूसेक्स असा एकूण पवना नदी मध्ये सुरू असणारा ३५०० क्युसेक्स विसर्ग वाढवून दुपारी २ वाजता ५६०० क्यूसेक्स करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार त्यात बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी, जास्त करण्याची शक्यता असल्याचे पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.