पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील दहा हजार चौरस मीटर व त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाच्या भूखंडावरील सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक आहे. मात्र, शहरातील ४१ बड्या सोसायट्यांनी प्रकल्प कार्यान्वित केला नाही. या सर्व सोसायट्यांना महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्यातर्फे दोन वेळा नोटिसा देण्यात आल्या. तरीही प्रतिसाद न दिलेल्या ४१ सोसायटीधारकांचे ११ डिसेंबरपासून नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने दहा हजार चौरस – मीटर व त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाच्या भूखंडावरील सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे. नियमानुसार प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर न करणाऱ्या सोसायट्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याची तरतूद आहे.
शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत तपासणी केलेली आहे. ज्या सोसायट्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत, त्यांच्याविरोधात ही कारवाई प्रस्तावित आहे. त्यांनी तत्काळ प्रकल्प कार्यान्वित करून महापालिकेला सहकार्य करावे. नळ कनेक्शन बंद करून पाणीपुरवठा रोखण्याची कारवाई टाळावी.– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, महापालिका