पिंपरी (Pclive7.com):- एकीकडे कोट्यावधी रूपयांचा खुलेआम भ्रष्टाचार करायचा अन् दुसरीकडे महिलांसाठी राबविण्यात येणार्या पवनाथडी जत्रेत ३४ ते ४० लाख बचत केल्याचा आव आणायचा प्रकार भाजप शहराध्यक्षांनी केला आहे. पूर्वी पवनाथडी जत्रा स्वत:च्या कार्यक्षेत्रात घेण्यासाठी आटापिटा करत होते. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना महिला सक्षमीकरणासाठी येणार्या खर्चात बचत होत असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.
याबाबत संजोग वाघेरे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भाजपचे शहराध्यक्ष व त्यांच्या पदाधिका-यांच्या अधिपत्याखालील महिला बचतगटांचे जास्त अर्ज पवनाथडी स्टॉल मिळवण्यासाठी दाखल झाले आहेत. महापालिकेकडे दाखल झालेले १२०० बचत गटांचे अर्ज हे पवनथडीच्या यशाचे बोलके उदाहरण आहे.आतापर्यंतच्या सांगवीतील सर्व पवनाथडीमध्ये हेच भाजपचे अध्यक्ष राष्ट्रवादीमध्ये असताना पाहुण्या – रावळयांना बोलवून शहरातील महिलांच्या कलागुणांना वाव देत होते. सांस्कृतिक कार्यक्रम स्वतः ठरवत होते. तेच आता भाजपमध्ये गेल्यावर याच महिलांच्या कलागुणांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे शहारातील महिलांचे दुर्भाग्य आहे.
महिलांसाठीचे ४० लाख वाचविण्यापेक्षा ४२५ कोटींची ठेकेदारांची रिंग झाली आहे. त्यातील २५ टक्के रक्कम वाचवा म्हणजे नागरिकांच्या १०६ कोटींची बचत होर्इल. तसेच सल्लागारांची नेमणूक करूनही कोटयावधींचा पारदर्शक नियोजनबद्ध भ्रष्टाचार चालू आहे ते बघावे, ४२५ कोटींच्या रिंगमध्ये भाजपचे सर्व पदाधिका-यांचा वाटा ठरलेला आहे. त्यामुळे त्याबाबत भाजप अध्यक्ष काहीच बोलू शकणार नाहीत. ही कोट्यावधी रक्कम भाजपच्या पदाधिकार्यांच्या व ठेकेदारांच्या घशात जाणार व कमी पडणार म्हणूनचं की काय आमच्या शहरातील महिलांच्या हक्काची पवनाथडी जत्रेत काटकसर करण्याचे नाटक चालू आहे. त्यातही ३५ ते ४० लाखांची बचत करून त्यातही पुढे चिरीमिरी भेटतील का ? याचा विचार पारदर्शी भ्रष्टाचारी भाजप करत आहे हे शहरांचे दुदैव आहे.
पुढे त्यांनी म्हटलयं की, गेल्या १० वर्षात महिलांसाठी होणा-या खर्चात बचत करावी ही सुपिक कल्पना भाजप अध्यक्षांना का सुचली नाही? कारण तेव्हा स्वतःच्या नावाला फुकटची प्रसिद्धी मिळत होती, आता सत्तेचा दुरूपयोग करून लोकांनाच दावणीला बांधण्याचे कटू कारस्थान करित आहेत. स्थायी समितीमध्ये राजरोसपणे भ्रष्टाचार खुलेआम चालू असणा-या भाजप अध्यक्षांचाच आर्शीवाद आहे, त्यांच्या मार्गदर्शनानेच भ्रष्टाचाराचे नियोजन चालू आहे. विठ्ठल – रूक्मिणी मुर्ती घोटाळांच्या तपासणी अहवालात भाजपाच्या खोटारडेपणा सिद्ध झाला आहे. नागरिकांना धार्मिकतेबाबत संवेदनशील करून खोटे बोलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची बदनामी केली हे सिध्द झाले आहे. त्यामुळे भाजपच्या आताच्या पदाधिका-या विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. या खोटेपणामुळे राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे संख्याबळ कमी झाले. खोटया भाषणांमुळे आणि खोटया प्रचारामुळे शहराची ही परिस्थिती आहे. अजूनही भ्रष्टाचाराला बगल देण्यासाठी मनपाच्या बचतीचा खोटा आव आणला जात आहे.
एकाच वर्षात भाजपने भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. महिलांच्या कलागुणांमध्ये पैसे वाचविण्याचा आभास करून ४२५ कोटींच्या रिंगच्या भ्रष्टाचाराचे लक्ष वळवण्याचा भाजप अध्यक्षांचा प्रयत्न आहे. म्हणजेच या कोटयावधींच्या भ्रष्टाचारात सर्वांचेच हात बरबटलेले आहेत. हा भ्रष्टाचार लपविण्यासाठी शहरातील महिलांच्या अनुभवासाठीचे पवनाथडीचे कामात बचत करण्याचा हेतु हा भ्रष्टाचाराच आहे. म्हणून त्यांचा जाहिर निषेध असल्याचे संजोग वाघेरे यांनी पत्रकात म्हटले आहे.