पिंपरी (Pclive7.com):- मोठा गाजावाजा करत सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानाचा चांगलाच फज्जा शहरात उडाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांनी आज महापालिका भवनासमोरच ‘कचरा फेको’ आंदोलन करत सत्ताधारी भाजपचा आणि प्रशासनाचा निषेध केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वार्ड क्रमांक १२ रुपीनगर, त्रिवेणीनगर आणि म्हेत्रेवस्ती या परिसरातील आणि सोसाट्यांमधील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला जात नाही. परिसरात जागो-जागी कच-याचे ढीगच्या-ढीग साचले आहेत. सोसाट्यांमध्ये देखील कच-याचे ढीग साचले आहेत. जागोजागी साचलेल्या कच-याच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागातील कचरा उचलण्यास महापालिकेची गाडी येत नाही.
गेल्या अनेक दिवसांनतर शुक्रवारी प्रभागात कच-याची गाडी आली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नगरसेविका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांने थेट कच-याची गाडी घेऊन महापालिकेत आले. गाडीतील कचरा महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकण्यात आला आहे.
याबाबत बोलताना स्थानिक नगरसेविका पौर्णिमा सोनवणे म्हणाल्या, गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागात कचरा उचलणारी गाडी येत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रभागात कच-याचे ढीग साचले आहेत. कच-याची दुर्गंधी सुटली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार प्रशासाकडे पाठपुरावा केला. परंतु, प्रशासन जाणीपुर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका प्रशासनाला या गंभीर प्रश्नांची जाणीव व्हावी, यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेकून आंदोलन करण्यात आले.