पिंपरी (Pclive7.com):- सुखी जीवन जगायचे असेल तर पुण्याशिवाय मार्ग नाही. फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहाणे गरजेचे आहे. जे काही कार्य कराल ते आनंदाने, मनाने आणि हृदयापासून केल्यास फळ मिळेल. फळाच्या मागे लागायची गरज भासत नाही. थोडे कर्म केले की आपण फळाची अपेक्षा करतो. फळ का मिळत नाही, याचा विचार करतो. त्यामुळे कार्यावरील लक्ष विचलित होते. त्यामुळे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा, सुख मिळणारच, असे प्रबोधन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी केले. पैसा जेवढा महत्वाचा आहे. तेवढेच सुखी जीवन जगण्यासाठी पुण्य गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
आमदार महेश लांडगे आणि मित्र परिवाराच्या वतीने भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानात १२ ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या ५१ व्या ‘संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याचे शुक्रवारी मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. ‘सुखी जीवनाचे गुपित’ या विषयावरील पहिले पुष्प प्रल्हाद वामनराव पै यांनी गुंफले. यावेळी महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, जीवनविद्या फाऊंडेशनचे सुभाष केळकर, जीवनविद्या मिशनचे शैलेश जोशी, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक राहुल जाधव, कुंदन गायकवाड, संतोष लोंढे, नितीन लांडगे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, राजेंद्र लांडगे, विलास मडेगिरी, संजय नेवाळे, वसंत बो-हाटे, नगरसेविका साधना मळेकर, अश्विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, कमल घोलप, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, यशोदा बोईनवाड, योगिता नागरगोजे, नम्रता लोंढे, स्वीनल म्हेत्रे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, दिनेश यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रल्हाद पै म्हणाले की, ”मानव जात सुखाच्या मागे लागली आहे. सर्वांना सुख पाहिजे. परंतु, सुख म्हणजे नेमके काय हे कोणालाच समजले नाही. त्यामुळे सर्वजन सैरभैर होऊन सुखाच्या मागे धावत आहेत. सर्वजण सुख म्हणजे पैसे अशी कल्पना करतात. पैसा म्हणजे सुख या कल्पनेचे भूत सगळ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. त्याच्या मागे धावत असताना मध्ये आडवे येणा-याच्या मुडदे पाडले जातात. पैशाची नशा वेडी आहे. पैसा मिळविला पाहिजे. मात्र, सुख म्हणजे पैसा नाही, याचा विसर पडत आहे. पैशाच्या मागे धावताना आरोग्याची काळजी देखील घेतली जात नाही. शरीर परमेश्वर असून या परमेश्वराकडे दुर्लक्ष करून मिळविलेल्या पैशाचा काय उपयोग नाही. पैशाच्या जेवढे मागे लागाल तेवढे जास्त दु:ख मिळेल”.
”पैसा जेवढा महत्वाचा आहे. तेवढेच सुखी जीवन जगण्यासाठी पुण्य गरजेचे आहे. पैसा आणि पुण्य या दोन गोष्टी घेऊन काम केल्यास प्रत्येकजण आयुष्यात नक्की यशस्वी होईल. पैसा मिळविण्याच्या नादात विवेक संपत चालला आहे. शहाणपणा कमी पडत आहे. पैसा मिळविताना विवेकाची कास सोडू नये. पैसा मिळविताना त्याला विवेकाची जोड दिली तर चांगली प्रगती होऊ शकते. सुखी जीवन जगायचे असेल तर पुण्याशिवाय मार्ग नाही. कर्म घेऊन वाटचाल केली तर सुखाला कमी पडणार नाही”, असे सांगत प्रल्हाद वामनराव पै म्हणाले, ”निसर्गाचे नियम पाळले तर निसर्ग सर्वकाही देण्यासाठी समर्थ आहे. निसर्गनियम शास्त्रशुद्ध आहेत. परमेश्वर म्हणजे निसर्गच आहे. त्यामुळे निसर्गाचे नियम पाळा”.
”नियमाला प्रतिसाद देणे म्हणजे परमेश्वर आहे. निसर्ग नियम जीवनात सर्वांत महत्वाचे आहेत. चांगले कार्य केले तर खूप मिळेल हे ऐकायला बरे वाटते. पण ते आचरणात आणायला कठीण आहे. थोडे कर्म करत असताना दुष्य कर्माचा विसर पडतो. सद्गुरु सांगतात कर्मावर तुमचा अधिकार आहे. फळावर नाही. कारण, फळ मिळविण्याची शक्ती कर्मामध्ये आहे. म्हणून कर्म केले फळ निश्चित आहे. त्यामुळे फळ मिळणारच असून त्याची अपेक्षा करायची नाही. फळ कोठून कसे मिळणार, त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. कर्म करताना फळाची आसक्ती असते. फळाला अधीर होतो. त्यामुळे फळाची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे कर्म करताना फळाबाबत अधिर होऊ नका, ते घातक आहे. कर्म करताना ध्येय, हेतू आणि दिक्षा माहिती असली पाहिजे, असे जेव्हा होते. फळ नक्कीच मिळते. राष्ट्रप्रगतीचे हेतू डोळ्यासमोर ठेऊन काम करा. तुमचे ध्येय पूर्ण होईल. सर्वात मोठे ध्येय राष्ट्रप्रगती असले पाहिजे”, असे प्रबोधन प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.
कार्यक्रमाला श्रोत्यांची उपस्थिती पाहून प्रल्हाद वामनराव पै भारावून गेले. ते म्हणाले, आमदार महेश लांडगे यांना दमदार आमदार म्हणतात, हे आजवर ऐकले होते. त्यांना दमदार आमदार का म्हणतात हे ऐश्वर्य पाहून समजले. त्यांच्यात किती दम आहे, तो आज पाहिला.
सर्वांचे स्वागत करताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, सद्गुरुंची प्रार्थना ख-या अर्थाने निस्वार्थी आहे. ही प्रार्थना ऐकल्यावर माणूस स्वत:साठी सोडून सर्वांसाठी जगतो. आपल्या परिसरात चांगले विचार जावेत, ही माझी इच्छा होती. या कार्यक्रमाचा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.