पिंपरी (Pclive7.com):- बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी केलेला कायदा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, गेल्या १३ वर्षांपासून खासदार असणा-या शिवाजीराव आढळराव यांनी बैलगाडा शर्यतीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. आता लोकसभेची निवडणूक जवळ आली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रक काढण्यात पटाईत असलेले आढळराव यांनी पत्रकबाजी करण्यास सुरुवात केली आहे. बैलगाडा शर्यतीबाबत ते गंभीर नसून केवळ भावनिक मुद्दा करुन ते आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा, हल्लाबोल भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी करावयाच्या कायद्यातील बदलाला केंद्र सरकारने लेखी नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन नगरसेवक राहुल जाधव यांनी खासदार आढळराव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेवक जाधव यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न प्रलंबित आहे. खासदार शिवाजीराव आढळराव हे गेल्या १३ वर्षांपासून खासदार आहेत. प्रत्येकवेळी निवडणुक आली की आढळराव बैलगाडा शर्यतीचा प्रश्न हाती घेतात. सरकारवर आरोप करतात आणि आपण किती बैलगाडा मालकांच्या बाजुने आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.
शेतक-यांमध्ये जातात मी बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न करत असल्याचे खोटे सांगतात आणि नागरिकांना भुलवतात. २००९ आणि २०१४ ची लोकसभा निवडणुक त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या मुद्यांवरुनच लढवून जिंकली. मात्र, शर्यतीचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. त्यामुळे बैलगाडा मालक-चालक संघटना त्यांच्याविरोधात गेल्या आहेत. केवळ निवडणूक जवळ आली की त्यांना बैलगाडा शर्यतीची आठवण होते, असेही जाधव म्हणाले.
आमदार महेश लांडगे यांनी तीन वर्षात राज्य सरकारच्या पाठीमागे लागून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत कायदा तयार करुन घेतला. विशेष म्हणजे, भाजप सरकारमधील विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी पाठींबा देवून संबंधित विधेयक मंजूर केले. तसेच, न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारने स्वखर्चातून वकीलांची नेमणूक केली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार मोठे प्रयत्न करत आहे.
राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला की शिवसेना सत्तेत आहे. आमचे देखील तो कायदा करण्यात योगदान आहे, असे सांगून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार शिवाजीराव आढळराव करतात. या कायद्याला न्यायालयाने स्थगिती दिली की हेच खासदार सरड्याला लाजवेल अशा प्रकारे रंग बदलतात आणि सरकारवर टीका करतात. सरकारने कायदा सक्षम केला नसल्याचे सांगतात. कायदा करताना शिवसेनेचे योगदान असे सांगतात. मग, कायदा करताना शिवसेनेचे मंत्री, आमदार काय करत होते? असा सवालही नगरसेवक जाधव यांनी उपस्थित केला आहे.