पिंपरी (Pclive7.com):- समाजातील अनेक ध्येयवेडी माणसे स्वत:चा उदरनिर्वाह करून समाजासाठी आणि देशासाठीही काम करत असतात. अशाच प्रकारे देशाच्या रक्षणार्थ ‘जॉईन इंडियन आर्मी’ हा संदेश घेऊन भोसरीतील ‘मराठा वॉरियर्स’ या ग्रुपच्या १० ध्येयवेड्या तरुणांनी सायकलीवर पुणे ते वाघा बार्डर हि अनोखी मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पार पाडली.
भोसरी येथील ‘मराठा वॉरिअर्स’ या समूहातील राम फुगे, विश्वास काशिद, प्रशांत जाधव, निलेश धावडे, प्रज्ञेश मोळक, संतोष दरेकर, बजरंग मोळक, विजय हरगुडे, संदीप शिंदे व आठ वर्षीय अंशुमन धावडे अशा या ध्येयवेड्या तरुणांचा मोहिमेत सहभाग होता. या समुहाने सीमेवर लढा देणाऱ्या भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त तरुणांनी भारतीय सैन्यदलात सहभागी व्हावे यासाठी भोसरी ते वाघा बॉर्डर या तब्बल २००० किलोमीटरच्या सायकल रॅलीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाब अशा ४ राज्यातून १८ दिवस प्रवास करुन या दहा सायकलस्वारांनी २ हजार किलोमीटर अंतर पूर्ण केले. नुकतेच हे सायकलस्वार मोहीम फत्ते करून परतले आहेत. चार राज्यांच्या सीमा ओलांडून देशरक्षणार्थ संदेश देणे हे सर्वांसाठीच अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सायकलस्वारांनी सांगितले.
या मोहिमे दरम्यान मार्गातील शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील तरुणांना त्यांनी ‘भारतीय लष्कारामधील संधी’ यावर प्रबोधन केले. तसेच सायकल व आरोग्याचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले. या मोहिमेसाठी गेल्या ६ महिन्यांपासून या तरुणांची तयारी चालू होती. त्यात फिटनेस आणि नियमित सरावावर विशेष लक्ष देण्यावर सर्वांचा भर होता.
मराठा वॉरियर्सचे प्रमुख राम फुगे म्हणाले की, प्रत्येक वेळी काही तरी नवीन करायचे ठरवले होते. पुणे ते सिंगापूर असा ३ वर्षांपूर्वी दुचाकीने प्रवास केला आहे. तसेच ‘पुणे ते लेह-लडाख’ असा दुचाकीने प्रवास केला आहे. मराठी माणसे सैन्यात मोठ्या पदावर पोहोचली पाहिजेत, असा संदेश घेऊन सायकल वरून २००० किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्याचा अभिमान आहे. राज्याराज्यांतील विविधता आणि त्यातही देशातील एकात्मता ठिकठिकाणी दिसून आली तसेच तरुण विद्यार्थ्यांमध्ये देशरक्षणाची उत्स्फूर्त इच्छा आहे. याचे समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले.
१८ दिवसांचा खडतर प्रवास आणि स्थानिकांची मदत
मराठा वारीयर्स च्या सर्व सदस्यांना मोहिमेत प्रवासात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. राजस्थानात मुक्कामासाठी अनेक ठिकाणी स्थानिकांनी मदत केली, जैन मंदिर तसेच गोशाळा अशा ठिकाणी सायकलस्वारांनी मुक्काम केले, छप्पर येथे राजस्थान पोलीसांनी सायकलस्वारांची व्यवस्था उदघाटनही न झालेल्या हॉटेलमध्ये केली. पंजाबमध्ये काही रस्त्यांवर बेशिस्त वाहनचालकांमुळे सायकलस्वारांना त्रासाला सामोरे जावे लागले, तसेच अमृतसर मध्ये दाट धुक्यात दहा फुटांवरीलही दिसत नसताना सर्वच सायकलस्वारांनी काळजीपूर्वक प्रवास पूर्ण केला.
ठिकठिकाणी स्वागत आणि जल्लोष
मराठा वॉरियर्सच्या सर्व सायकलस्वारांचे भोसरी येथून प्रस्थान केल्यापासून ठिकठिकीणी स्थानिकांनी स्वागत केले. राजस्थान येथील आमदार फुलसिंग मीना, बडोदा येथे महाराज सत्यजित गायकवाड यांनी स्वागत केले तसेच उदयपूर येथील महाराज लक्ष्यराज सिंग यांनी आपल्या आलिशान पॅलेस मध्ये जंगी स्वागत केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. वाघा बॉर्डर वर बीएसएफ चे अधिकारी सैनी यांनी सर्व मोहिमवीरांचा सत्कार केला, यावेळी मराठा वारीयर्सचे सदस्य अक्षरशः भारावून गेले.
सोशल मीडियातून पाठिंबा
सोशल मीडियातूनही या सायकलस्वारांच्या वाघा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. दिवसभरात कापलेले अंतर आणि प्रवासात आलेले दुर्मिळ अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत होते ज्याला सर्व स्तरांतून चांगलीच पसंती मिळाली.