पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रविराज काळे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पोस्टाने पत्र पाठविले आहे. त्यातून हजारे यांना विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.
काय म्हटलय पत्रात ?
प्रिय आण्णा,
तुम्हाला पत्र लिहायचं कारण अस की, तुम्ही काही काळापूर्वी भ्रष्टाचारविरोधी मोठं आंदोलन उभे केले तेव्हा लाखोंच्या संख्येने लोक तुमच्यासोबत उभे राहिले. तुमच्या मते, भ्रष्ट लोकांना सत्तेत राहायचा अधिकार नाही असं म्हणत तुम्ही त्या काळात असलेलं सरकार पाडण्यासाठी आंदोलन उभ केल अर्थात त्यामुळे सत्ता बदल झाला व नवीन सरकार स्थापन झालं…. आणि आण्णा गंमतच झाली पेट्रोल डायरेक्ट 40 रुपये लिटर झालं, गॅस सिलेंडर 220 रू मिळायला लागला GST टॅक्स मधून लोकांना मोकळीक मिळाली आणि राजकारणामध्ये सुसंस्कृत पणा आला. अजिबात कुणी पक्ष फोडेना, आमदार पळवेना,कुणी कुणाचा बाप चोरेना सगळं कस व्यवस्थित चालू झाल बघा. महिलांवर होणारे अत्याचार थांबले. शेतकरी आत्महत्या थांबल्या. अहो शेतकरी 4 चाकी घेऊन फिरू लागले. सगळीकडे आनंदी आनंद….. आम्ही तर अण्णा वर्षातील प्रत्येक दिवस दिवाळी करायला लागलो. तुमचं ना परत आंदोलन झालं ना तुम्ही कोणत स्टेटमेंट केलं.
कसं कराल ना, भारत विकसित झाला होता. जगात 1 नंबरचा देश झाला. तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटला. सबका साथ म्हणत सगळ्यांचा विकास झाला . अहो आण्णा यावर पुढचे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या खात्यात 15, 15 लाख रुपये जमा झाले. लोकांना आनंदाने झोप येईना हो… काही जणांनी तर आयुष्यात पहिल्यांदा एवढे पैसे पाहिले. तिकडे अयोध्या मध्ये तर भारतातील सगळ्यात मोठ हॉस्पिटल उभ झालं आणि गुजरात मध्ये तर सगळ्यात मोठी आणि उंच लायब्ररी उभी झाली. काय सांगू आण्णा विकास डोळ्यात मावतच नव्हता इतका विकास की देशातील जातीवाद पूर्ण बंद झाला. सगळे कसे गुण्या – गोविंदाने एकत्र राहायला लागले आहेत. नदी जोड प्रकल्प पूर्ण झाला. कोणत्याच गावात दुष्काळ नाही पाण्याचा टँकर तर बघ्यालाच मिळणं हो.
अहो काहीजण तर यात्रा काढून म्हणतात डरो मत. तुम्हीच सांगा अण्णा, का नाही घाबरायचं लोकांनी, घाबरलच पाहिजे आणि जास्तीत जास्त घाबरलं पाहिजे. पत्रकार तर अण्णा, एक चकार शब्द काढत नाहीत. त्यांना पण अण्णा तुम्ही जरा बोलत केलं तर बर होईल ..ED इतक्या स्वच्छ प्रतिमेने काम करतेय की एका पण निरपराधांला ED ने अटक केली नाही. सरकारच्या दबावाखाली बी अजिबात आली नाही. इतका सगळा विकास झाला पण अण्णा आता तर हे विरोधक उगाचच पोपटाव्हानी वटवट करत्यात अन म्हणत्यात पेट्रोल महाग झालंय, बेरोजगारी वाढली , धार्मिक तेढ निर्माण झालंय. हे सगळ काही मला बघवेना, तेव्हा अण्णा तुम्ही एकदा यांच्याकडे बघा आणि यांचे कान धरा … एवढ सगळं केलंत तुम्ही मग आता शांत का अण्णा तुम्ही पुन्हा बोला. तुमची लय आठवण येतेय. असो, तुमच्या उतराची वाट पाहतो.
























Join Our Whatsapp Group