पिंपरी (Pclive7.com):- गेल्या आठवड्यात मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर आरोप केलेत. या वादात आता राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार विलास लांडे यांनी उडी घेतली आहे. कचरा प्रश्नी कुणालाच गांभिर्य नाही. केवळ निवडणुका आल्यात म्हणून युतीचे खासदार, आमदार नागरिकांसमोर नाटक करत असल्याचा ‘हल्लाबोल’ विलास लांडे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील हल्लाबोल आंदोलनाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते योगेश बहल, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जेष्ठ नेते हनुमंत गावडे, नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले की, मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीची पाहणी करणे म्हणजे युतीच्या खासदार, आमदारांनी नागरिकांसमोर केलेले नाटक म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुक जवळ आल्यामुळेच आढळराव फिरकू लागलेत. यापूर्वी १५ वर्षात कचरा डेपोला कधीच आग लागली नव्हती. भाजपची सत्ता येताच आग कशी लागली हा प्रश्नच आहे. महापालिकेतील सत्ताधार्यांनी योग्य उपाययोजना केल्या नसल्यामुळेच आगीची घटना घडली आहे. भाजपच्या सत्तेला सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्ष मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात पुरविल्या होत्या. आताच्या सत्ताधा-यांना मात्र मुलभूत सुविधा पुरविता येत नसल्याचा आरोप विलास लांडे यांनी केला.