पिंपरी (Pclive7.com):- आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळ यांना जामीन मंजूर केला आहे. तर छगन भुजबळांना मिळालेल्या जामिनाचे स्वागतच आहे, आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी व्यक्त केले आहे.
अमित बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली दोन वर्षे छगन भुजबळांना तुरुंगवास भोगावा लागला, परंतू जनतेची असणारी साथ व राष्ट्रवादी पक्ष सातत्याने भुजबळांच्या सुख दुख:त खंबीरपणे उभा राहिल्याचे सर्वांनिच पाहिले आहे. एक अभ्यासू, प्रभावी जनतेच्या न्याय हक्कांसाठी नेहमी तत्पर असणारे भुजबळ सबंध महाराष्ट्राने पाहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ताकाळात नेहमीच महाराष्ट्र विकासाला प्राधान्य दिले आहे. परंतु, भाजपने जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवित सत्ता मिळविली, सत्ता मिळाल्यानंतर भाजपकडून विकास अपेक्षित होता. याउलट सत्तेचा गैरवापर करीत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बेछूट आरोप करीत आहे. राजकीय सुडापोटी भुजबळांसारख्या व्यक्तिमत्वाला विवीध प्रकरणात जाणीवपुर्वक गाेवण्यात आले आहे. आगामी काळात राजकीय षडयंत्रापोटी भुजबळांना गोवण्यात आलेल्या प्रकरणातून ते निर्दोषपणाने मुक्त होतील, असा विश्वास बच्छाव यांनी व्यक्त केला आहे.