पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी भाषा आलीच पाहिजे. मराठी आपली मातृभाषा आहे, त्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. अभिजात दर्जा देण्याचे धाडस केवळ नरेंद्र मोदींनी केलं आहे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांची बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी आपली ही मातृभाषा आहे. तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काही कारण नाही. कारण की मराठी आपली मातृभाषा आहे. केंद्र सरकारने मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

नाशिक दंगली प्रकरणात आम्ही कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून केस दाखल करत नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करत आहोत. कुणालाही सोडले जाणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
बीडचे निलंबित पीएसआय अभिजीत कासले यांनी आरोप केले, त्याची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली त्याचे फोटो मला काल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. जे दोषी असतील त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल असे ही अजित पवार म्हणाले.
