भाजपा आमदार महेश लांडगे यांनी खडसावले; नागरिकांच्या आरोग्याचा विषय गांभीर्याने घ्या..!
भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये शहर आणि उपनगरांमध्ये पिवळसर आणि दुषित पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विषय गांभीर्याने घ्यावा. कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष खपवून घेणार नाही, अशा शब्दांत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना खडसावले आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पाणी समस्याही वाढत आहे. शहरातील काही भागांत दुषित पाणी पुवठा होत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, प्रशासनाकडून स्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी जलसंपदा विभाग, महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आंद्रा पाणी पुरवठा प्रकल्पाच्या निघोजे जॅकवेल येथे तसेच, पवना पाणी पुरवठा प्रकल्पाच्या निगडी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी महापालिका मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता विजयकुमार भोसले, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कावळे, प्रशांत जगताप, राजेंद्र मोरनकर तसेच संबधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवड महापालिका उचलते. त्यासाठी ‘फ्रेश वॉटर’ जलसंपदा विभागातर्फे दिले जाते. गेल्या काही दिवसांत जलसंपदा विभागाचे देहू ते निघोजे दरम्यान तांत्रिक काम सुरू असल्यामुळे धरणामधून होणारा फ्रेश पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड हद्दीबाहेरील म्हाळुंगे, देहू, तळेगाव या भागातील रहिवाशी क्षेत्रातील सांडपाणी आणि औद्योगिक पट्टयातील रसायनमिश्रीत पाणी नदी पात्रात मिसळत होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पाणी प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे.
याबाबत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री. गुणाले आणि कार्यकारी अभियंता श्री. दुबल यांना आमदार महेश लांडगे यांनी तात्काळ फोन केला आणि ताबडतोब काम पूर्ण करण्याबाबत सक्त सूचना केली आहे. तसेच, रोज फ्रेश पाण्याचा पुरवठा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला झालाच पाहिजे, याबाबत सक्त सूचना दिल्या.
तसेच, पवना पाणी पुरवठा योजनेंतर्गत निगडी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली असता, महापालिका हद्दीतबाहेर पवना नदीपात्रात सांडपाणी आणि रसायनमिश्रित पाणी प्रक्रियाविना सोडले जात आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रदूषित पाणी येते. त्यावर प्रक्रिया करताना प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या.
नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा…
पवना आणि आंद्रा धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा. धरणातून पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे. जलसंपदा विभागाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. नागरिकांना ‘फ्रेश वॉटर’ मिळाले पाहिजे. ज्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यासाठी पाणी प्रक्रियेबाबत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल का? यावर प्रशासनाने तज्ञांकडून सल्ला घ्यावा, अशाही सूचना आमदार लांडगे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा सक्षम आणि स्वच्छ असावा. यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यासाठी महापालिका प्रशासन, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ अशा अस्थापनांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षीत आहे. त्या अनुशंगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी ‘कृती आराखडा’ तयार करावा. पिंपरी-चिंचवडकरांना शुद्ध पाणीपुरवठा करणे, ही प्रशासनासह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, त्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.