पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगांव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून सलग तिन वर्षे धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तिस-या वर्षी काम सुरू केल्यानंतर मागील १५ दिवसात तब्बल ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. तर, तीन वर्षात एकूण १०६ क्युबिक मीटर गाळ धरणातून बाहेर निघाल्याने धरणातील पाणीसाठ्यात यावर्षी आखणी वाढ होणार आहे.
जल संवर्धन व पवना धरणातील जलसंय वाढवून पिंपरी चिंचवड शहरातील, तसेच मावळवासीयांच्या पाण्याची समस्या सोडविण्याच्या या कामात सलग तिस-या वर्षी सातत्य ठेवले आहे. मागील सलग दोन वर्षे ७५ क्युबिक मीटर गाळ पवना धरण क्षेत्रातून काढल्यानंतर यावर्षी पुन्हा १० मे २०१८ पासून गाळ काढण्याचे धरण क्षेत्रात सुरू करण्यात आले. पवना धरण क्षेत्रातील ठाकुरसाई, खडक देवंडे, जोण, आपटी अशा विविध गावांसह हे गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली. पाटबंधारे शाखा अभियंता मनोहर खाडे, तांत्रिक सहाय्यक तांबोई, शिवसेना विभाग प्रमुख अमित कुंभार आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले की, या वर्षी काम सुरू केल्यानंतर मागील १५ दिवसात धरण क्षेत्रातून आजअखेर ३१ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. मागील दोन वर्षात धरणातून ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला होता. या कामात सलग तिन वर्षे सातत्य ठेवल्यामुळे तब्बल १०६ क्युबिक मीटर गाळ आजअखेर धरण क्षेत्रातून काढण्यात आला आहे. त्यामुळे पवना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून यंदाच्या पावसाळ्यात आणखी अतिरिक्त जलसंजय धरणात होणार आहे. हा अतिरिक्त पाणीसाठा शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच मावळातील शेतक-यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका व सरकारी यंत्रनेने हे गाळ काढण्याचे धाडस केले नाही. परंतु, पिंपरी चिंचवड शहराला २०१५ मध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. तर, गेल्यावर्षी एकवेळ पाणीपुरवठा होता. गाळ काढल्यामुळे या वर्षी तशी पाणीटंचाई भासणार नाही. हा मोठा फायदा असल्याने पाठपुरावा प्रयत्न करून हे काम सुरू केल्याचे विशेष समाधान असल्याचे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्थानिक शेतक-यांशी खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून गाळ काढण्याचे काम करणा-यांना स्थानिक शेतक-यांना कुठल्याही प्रकार त्रास होणार नाही. त्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शेतक-यांचे कोणतेही नुकसान होणार नाही व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सायंकाळी उशिरा गाळ वाहतूक करू देऊ नका. याकडे लक्ष देण्यास पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना खासदार बारणे यांनी सांगितले.