पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज रविवार दि.१ जून २०२५ रोजी आरंभ बँक्वेट, बी.आर.टी.रोड, काळेवाडी येथे महत्वाच्या सामाजिक विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नुकतीच शहरातील कन्या वैष्णवी हगवणे – कस्पटे हिच्या बाबतीत जी दुर्घटना घडली त्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभर पडले आहेत. या घटनेमुळे मराठा समाजाबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे पुणे शहरातील सकल मराठा समाजाने लग्नव्यवस्थेसंदर्भात एकत्र बैठक घेऊन काही अटी व नियम लागू केलेले आहेत. याच धर्तीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा समाजाच्या धोरणात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लग्न समारंभा संदर्भात ती आचारसंहिता, तसेच नियम अटी हे या बैठकीत ठरवण्यात आले.

कै. वैष्णवीस श्रद्धांजली अर्पण करून सदर बैठकीस सुरुवात करण्यात आली. या बैठकीत समाजाची भविष्यातील वाटचाल व त्यासंदर्भात काही नियम व धोरणे निर्धारीत करण्यात आली आहेत. लग्न व्यवस्था व इतर कार्यक्रम व समारंभ याबाबतीत आचारसंहिता घालून देण्यात आलेली आहे. सर्व समाज बांधवांनी या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव व इतर समाजबांधवही उपस्थित होते. हा विषय फक्त मराठा समाजापुरता मर्यादित नसल्याने इतर समाज बांधवांनाही बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बऱ्याच उपस्थितांकडून वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या सदर सूचनांचा समावेश आचारसंहितेत करण्यात येणार आहे.
सभेचे प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले व सभा घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी तर प्रशांत शितोळे यांनी आचारसंहितेचे वाचन करून आभार मानले. यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, विलास लांडे, संजोग वाघेरे पाटील, सुरेश भोईर, नाना काटे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे प्रमुख सतीश दरेकर, भानुप्रताप बर्गे साहेब, राजेंद्र कुंजीर, पुणे शहर समन्वयक सचिन आडेकर, मराठा महासंघ संपर्कप्रमुख अनिल तागडे, रोहिदास कोंडे, सचिन साठे, अतुल शितोळे, एन बी भोंडवे, मधुकर मास्तर चिंचवडे, धोंडीबा भोंडवे इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व समाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

या बैठकीमध्ये तयार करण्यात आली नियमावली आचारसंहिता खालील प्रमाणे..
०१) मुलांच्या लग्नापूर्वी त्यांच्याशी आईवडिलांचा खुलेपणाने संवाद होणे आवश्यक आहे. यासाठी तसे वातावरण कुटुंबात तयार करणे ही आई वडिलांनी खबरदारी घ्यावी.
०२) लग्न वेळेवर लावावीत.
०३) ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो, त्या कुटुंबाशी रोटी-बेटी व्यवहार करणार नाही.
०३) सत्कार समारंभ थोडक्यात व्हावेत.
०४) स्टेजवरील गर्दी कमी व्हावी.
०५) मिरवणुकांना आवर घालावा.
०६) स्वागत समारंभाला प्राधान्य द्यावे.
०७) अनावश्यक खर्च टाळावेत. लग्न साधेपणाने व्हायला पाहिजे.
०८) स्वागत व आशीर्वाद एकेकच व्हावेत.
०९) औक्षण करताना सुवासिनींची व गंध लावतांना मान्यवरांची संख्या मर्यादित असावी.
१०) मुलींच्या संसारामध्ये आई वडिलांचा हस्तक्षेप नसावा.
११) मुलीवर अन्याय होत असेल तर मुलीच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे.
१२) दशक्रिया विधी / अंत्यविधी याबाबत श्रद्धांजली एक ग्रामस्थ / एक मान्यवर
१३) देणगी पाकिटे पुकारताना मर्यादा असावी.

या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्वांनी या नियमावलीचे पालन करावे व इतरांनीही सहकार्य करावे असे आवाहन सर्वांना करण्यात आले.