पिंपरी (Pclive7.com):- जगद्गुरू तुकोबांचे अभंग तारणार्या इंद्रायणीच्या साक्षीने ज्येष्ठ कवी सुरेश कंक लिखित ‘कृष्णार्पण’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आनंद डोह, गाथामंदिराजवळ, देहू येथे रविवार, दि.०८ जून रोजी संपन्न झाले. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे अशा पारंपरिक प्रकाशन पद्धतीला छेद देऊन सर्व उपस्थित साहित्यिक हेच अध्यक्ष आणि हेच प्रमुख पाहुणे समजून सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीत साहित्यविश्वातील हा आगळावेगळा प्रकाशन समारंभ अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, राजेंद्र घावटे, प्रदीप गांधलीकर, नारायण कुंभार यांनी मनोगतातून ‘कृष्णार्पण’ या संग्रहातील कवितांची तसेच सुरेश कंक यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची आस्वादक समीक्षा केली. सुहास घुमरे, राधाबाई वाघमारे, हेमंत जोशी, मेहमुदा शेख, आनंद मुळूक, कल्पना बंब, पीतांबर लोहार यांनी आध्यात्मिक विषयांवरील कवितांचे प्रभावी सादरीकरण करीत भक्तिरसाचा परिपोष केला. प्रकाशिका शामला पंडित यांनी स्वागत केले.

कवी सुरेश कंक यांनी मनोगतातून, ‘वडिलांनी दिलेल्या रोजनिशीत मी कविता स्फुरली की लिहून ठेवीत असे. यथावकाश रोजनिशी जीर्ण झाली; परंतु आजतागायत त्यातून जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तीन कवितासंग्रहांची निर्मिती झाली आहे. साहित्य क्षेत्रातील कालबाह्य रूढी – परंपरा यांना फाटा देत प्रत्येक साहित्यिक हा मान्यवर असतो या भावनेतून आजचा सोहळा आयोजित केला आहे!’ अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी सर्व उपस्थितांना सहभागी करून घेत इंद्रायणी नदीच्या जलाशयातील नावेत तसेच आनंद डोहाच्या काठावर कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यामध्ये संत तुकाराममहाराजांच्या वेषभूषेतील प्रकाश घोरपडे, कैलास भैरट, पांडुरंग सुतार, उमेंद्र बिसेन, बळीराम शेवते, विवेक कुलकर्णी, अर्जुन चौधरी, सुनीता घोडके, अरुण घोडके, गजानन टाक, राधाकिसन दराडे, श्रीकांत दराडे, ऋतुजा दराडे, भाऊसाहेब गायकवाड, प्रकाश रसाळ, मच्छिंद्र जुरांगे यांना सहभागी करून घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या संयोजनात अशोकमहाराज गोरे, मुरलीधर दळवी, अरुण परदेशी, जयश्री गुमास्ते, शरद काणेकर, शामराव सरकाळे, फुलवती जगताप यांनी परिश्रम घेतले. सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले. भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.