पिंपरी (Pclive7.com):- सालाबादप्रमाणे यंदाही १९ जून २०२५ रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी येथे दाखल होत असून, या पार्श्वभूमीवर हजारो वारकरी बांधवांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी जोरात सुरू आहे. परंतु, मंडप उभारणीसाठी परवाना मिळण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे सेवाभावी संस्था आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी यासंदर्भात मनपा आयुक्त शेखर सिंह व पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे विनंती केली असून, “अन्नदानासाठी आवश्यक असलेले मंडप परवाने देताना नियमावली तात्काळ शिथील करावी, जेणेकरून हजारो वारकरी बांधवांना योग्य सुविधा मिळतील” अशी मागणी त्यांनी केली आहे.

निगडी भक्ती शक्ती उड्डाणपूल ते निगडी बसस्टॉप या मार्गावर विविध संस्था, मंडळे व कार्यकर्त्यांच्या वतीने वारकऱ्यांना चहा-नाश्ता, जेवण, औषधोपचार, रेनकोट, छत्री यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. अनेक संस्थांनी निगडी पोलिस स्टेशनकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेतले असून, महानगरपालिकेकडे मंडप परवाना शुल्क भरून अर्ज सुद्धा केला आहे.

तरीदेखील, पोलीस प्रशासनाच्या ‘सुरक्षा कारणास्तव’ हरकत दाखवून परवाना नाकारण्याच्या भूमिकेमुळे अन्नदान व सेवा कार्यात अडथळे येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वीरित्या पार पडत असतानाही यंदा नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात आल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ही महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा आहे आणि या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरांवर समन्वय आवश्यक असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.