पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही दत्ता साने यांनी सातत्याने स्वत:च्या पक्षाविरोधात गरळ ओकण्याचे काम केले होते. तेव्हाही त्यांची ‘डाळ’ शिजली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीची सत्ता जाऊन कोणीही प्रभावी पदाधिकारी आणि स्थानिक नेता नसल्याने दत्ता साने यांच्याकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद आले आहे. मात्र कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास नसल्याने त्यांच्याकडे मुद्दा नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून स्वत:चे अस्तित्व डळमळीत होऊ नये म्हणून त्यांच्याकडून सातत्याने आरोप केले जातात. साने यांचे हे आरोप म्हणजे केवळ ‘कोल्हे कुई’ आहे, असा टोला महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना शास्तीकर माफीचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार असल्याचे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना जाहीर केले आहे. त्यावर दत्ता साने यांनी आरोप केले होते. त्याला प्रतुत्त्यर देताना एकनाथ पवार यांना टोला लगावला आहे. याबाबत एकनाथ पवार यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. यात नमूद केले आहे की, शहरातील नागरिकांना शास्तीकराचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि पालकमंत्री गिरिष बापट यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शास्तीकराचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. मात्र यातही राजकारण करून दत्ता साने शहरवासीयांच्या भावनेशी खेळ चालविला आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सलग पंधरा वर्षे सत्ता असतानाही त्यांना करदात्यांचे हे सर्व प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यामुळे करदात्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. हे सर्व टाळण्यासाठी भाजपाने सातत्याने प्रयत्न केला. निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्वासन भाजपाने पाळले आहे. शहरातील करदात्यांची शास्तीकरातून मुक्तता होणार आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
करदात्यांना दिलासा मिळणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा नाकर्तेपणा समोर आला आहे. महापालिकेत सलग दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांना करदात्यांना दिलासा देता आला नाही. महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन केवळ दीड वर्ष झाले आहे. असे असतानाही भाजपाने सत्ताधारी म्हणून मतदारांना दिलेले आश्वासन पाळले आहे. मतदार भाजपाच्या कामगिरीवर समाधानी आहेत. हीच बाब दत्ता साने खटकत आहे. आपले पद आणि अस्तित्व डळमळीत होण्याची त्यांना सातत्याने भीती असते. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येतात. मात्र शहरवासीयांना त्यांच्या या ‘कोल्हे कुई’च्या सवयी माहिती झाल्या आहेत, असा टोला एकनाथ पवार यांनी दत्ता साने यांना लगावला आहे.