सेवादलाचे रक्तदान शिबीर संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रीमंडळातील ज्येष्ठ सहकारी, अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जातीयवाद व धार्मिकवादा विरुध्द घेतलेली भूमिका आजही प्रेरणादायी असल्याचे मत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले.
पोलाद पुरुष सरदार वल्लभभाई यांची जयंती आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त शहर काँग्रेसच्या वतीने पटेल आणि गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश पदाधिकारी बिंदू तिवारी, माजी नगरसेविका विद्या नवले, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विष्णूपंत नेवाळे, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, हरीदास नायर, वासिम इनामदार, विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, किरण जैन, ॲड. अनिरुध्द कांबळे, दिलीप पांढारकर, विनिता तिवारी, हिरामण खवळे, मनसुब खान, रामजी यादव, एम.कबीर, एन.रवी, सुनील राऊत आदी उपस्थित होते.
सचिन साठे यावेळी म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यासाठी पत्राव्दारे पंतप्रधानांकडे मागणी केली होती. ते पत्र आजही उपलब्ध आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:च्या प्राणाची आहुती देऊन देशातील धार्मिकवाद व जातीयवाद नाकारला. मात्र, आजचे सत्ताधारी पक्ष प्रांतवाद, जातीयवाद आणि धार्मिक वादाला प्रोत्साहन देत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांना तत्कालीन जनसंघ व आत्ताचे भाजपा यांचे विचार कधीही मान्य नव्हते. मागील साडेचार वर्षांतील सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी पंतप्रधान मोदी सरदार पटेल यांच्या पुतळ्याची उंची वाढवून स्वत:ची व पक्षाची प्रतिमा वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. अशीही टिका सचिन साठे यांनी केली. स्वागत मकरध्वज यादव, सुत्रसंचालन पांडुरंग जगताप आणि आभार चंद्रशेखर जाधव यांनी मानले.