पिंपरी (Pclive7.com):- गेल्या आर्थिक वर्षात ठरवून दिलेले उद्दिष्ट न गाठू शकलेल्या कर संकलन विभागातील 82 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ स्थगीत करण्यात आली आहे, तर अन्य कर्मचाऱ्यांना 250 रुपये दंड आकारण्यात आला आहे. या यामुळे कर संकलन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता सर्व कर्मचाऱ्यांना वसुलीचे लक्ष्य ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार महसूल गोळा करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. मात्र, या विभागातील 82 कर्मचारी ठरवून दिलेली लक्ष्यपूर्ती करू शकली नाही. त्यामुळे कर संकलन विभाग प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी 50 टक्के महसूल वसूल न करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ स्थगीत करण्यात आली आहे, तर 75 टक्क्यापेक्षा कमी उद्दीष्ट गाठू शकलेल्या कर्मचाऱ्यांना 250 रुपये दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईची या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद केली जाणार आहे.
शास्तीची रक्कम वसूल होऊन महसुलात भरीव वाढ व्हावी, याकरिता महापालिकेच्या वतीने अभय योजना जाहीर करण्यात आली होती. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महसुलात घट झाली आहे.
कर्मचारी महासंघाने आयुक्तांची भेट घेतली
या कारवाईची माहिती समजताच कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनी पिंपरी -चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन अन्यायकारक कारवाई विरोधात दाद मागितली. त्यानंतर कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन ही कारवाई रद्द करण्याची मागणी केली. यावर या कारवाईची माहिती घेण्याचे आश्वासन त्यांनी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.
विरोधी पक्षनेत्यांचेही आयुक्तांना निवेदन
विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर वसूल करण्यात कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक झालेली नाही. तरीदेखील या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे. या कारवाईचा त्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे ही कारवाई रद्द करण्याची मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.
अभय योजनेअंतर्गत 6 कोटी 23 लाखांची सूट
कर संकलन विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या अभय योजनेचा 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान एकूण 8 हजार 610 मिळकतदारांनी लाभ घेतला आहे. यामध्ये 35 कोटी 28 लाखांची वसुली करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत 6 कोटी 23 लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे.