दिल्ली (Pclive7.com):- सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची गरज आहे आणि ते बनेल त्यासाठी आम्ही पूर्ण आश्वस्त आहोत. असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज दिल्लीत असून तेथे महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, राज्यात ३२५ तालुक्यात शेतीचं नुकसान झालेलं आहे. अनेक गावांत शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे. यासंदर्भातल्या केंद्र सरकारच्या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री असतात. त्यामुळे मी अमित शहांची भेट घेतली.
‘शेतीचं किती नुकसान झालं आहे, याचं संपूर्ण डिटेल असेसमेंट मी शहा यांच्यासमोर ठेवलं आहे. यानंतर आवश्यक त्या मदतीसाठी ते नक्कीच पावले उचलतील. यासंदर्भातील एक दुष्काळ पाहणी पथकही महाराष्ट्रात येईल. शहा यांनी विविध सचिवांना माझ्यासमोर आमच्या बैठकीदरम्यान यासंदर्भात आदेश दिले,’ असंही फडणवीस यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेकजण बोलत आहेत मी त्याबाबत काहीही बोलणार नाही. सत्तेची समीकरणं रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल याची खात्री बाळगा असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विशेष बाब म्हणजे युती शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही.