मावळ (Pclive7.com):- तळेगाव – चाकण – शिक्रापूर हा ५४ किलोमीटर लांबीचा मावळ, खेड, शिरुर तालुक्यातील औधोगिक क्षेत्रास जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. महामार्गाची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्याचे सर्वेक्षण अहवाल तयार करून त्याचा भारतमाला प्रकल्पात समावेश करावा व त्याच्या कामास लवकरात लवकर सुरवात करावी, अशी मागणी करणारे निवेदन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी बुधवारी (दि.१२) केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना दिले.
आमदार सुनील शेळके यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तळेगाव- चाकण-शिक्रापूर महामार्ग हा पुणे जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक क्षेत्रांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गावरून सतत अवजड वाहतूक व मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असते. मात्र, या रस्त्याची रुंदी कमी असल्याने व रस्त्याची वारंवार दुरवस्था होत आहे व महामार्गावर अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी महामार्गाचा भारतमाला प्रकल्पात समावेश करावा व तातडीने या कामास सुरवात करण्यात यावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
यावेळी गडकरी यांनी तत्काळ मुंबईचे मुख्य महाव्यवस्थापक तांत्रिक प्रादेशिक अधिकारी राजेश सिंग यांना फोन करून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाची पहाणी करून त्या महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार करून सादर करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी गडकरी यांनी शेळके यांना पुरेसा वेळ देऊन तळेगाव येथील जेष्ठ नेते दिवंगत केशवराव वाडेकर यांच्या कुटुंबीयांची आत्मीयतेने विचारपूस केली. तसेच विविध विषयांवर चर्चा केली. आमदार शेळके यांनी गडकरी यांचे आभार मानले.