पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या संरक्षणात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय जाणिवपूर्वक व जातीय द्वेषभावनेतून केलेला प्रकार असून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निर्णयाविरोधात पिंपरीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर निषेध करण्यात आला. तसेच राज्य सरकारच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत यांनी बोलताना केली आहे.
शहराध्यक्ष सुरेश निकाळजे बोलताना म्हणाले की दलित, शोषित, वंचित समाजाच्या प्रश्नांसाठी रामदास आठवले हे पायाला भिंगरी लावून अहोरात्र फिरत असतात. दोन वर्षापूर्वी अंबरनाथ येथे एका कार्यक्रमात त्यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याअनुषंगाने रामदास आठवले यांना सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. मात्र केंद्रातील मंत्री असताना ही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने जाणिवपूर्वक राजकीय सूडबुध्दीने हा निर्णय घेतला आहे. सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा व रामदास आठवलेंची सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने केली आहे.
राज्याच्या राज्यमंत्र्याला जास्त सुरक्षा व केंद्रीय राज्यमंत्र्यांना कमी सुरक्षा हे कोणते सुरक्षेचे धोरण राज्य सरकारने व मुंबई पोलिसांनी अंगीकारले आहे, असा प्रश्न अजिजभाई शेख अध्यक्ष वाहतुक अघाडी महा.राज्य यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.
यावेळी अंदोलनात कुणाल व्हावळकर (युवक अध्यक्ष पि.चि), दुर्गाप्पा देवकर (शहरध्यक्ष कामगार आघाडी पिं चिं), विनोद चांदमारे (एम्पलोईज फेडरेशन जिल्हाध्यक्ष), शंकरशेठ इंगळे (संपर्क प्रमुख), यशवंत सूर्यवंशी, हरी नायर, मनोज जगताप, आप्पा भोसले, दिनकर म्हस्के, अक्षय दूंगाव आदी उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group