पिंपरी (Pclive7.com):- ‘जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो’, सत्तेत न आल्याची सल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरीत बोलून दाखवली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविडसेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. सध्या कोविडचा काळ आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आहे.ऑक्सिजनचा विषयही नियंत्रणात येत आहे. कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही.
मात्र, कोविड आहे म्हणून काय हवं ते करून घ्या, असंही करून चालणार नाही. शेवटी लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही.आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं.विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, असं पाटील म्हणाले.
उद्याच कोर्टात याचिका दाखल करतो
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरील धाड हा सीबीआयचा दुरुपयोग असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. कोर्टानेच या प्रकरणाची चौकशी लावली आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे का ? असेल तर मग उद्याच कोर्टात अवमानना याचिका दाखल करतो, असा इशारा देतानाच लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरू आहे. कोर्टाने केवल चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. त्यात शेवटच्या पॅऱ्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आहेत. यात सत्तेचा दुरुपयोग आला कुठे ? असा सवाल त्यांनी केला.
बंगाल, पंढरपूर जिंकणार
सुप्रीम कोर्टाने मोदींना फटकारले की बघा कोर्टाने केंद्राला फटकारले, असं संजय राऊत सांगतात, पण महाराष्ट्राला फटकारले की ते मॅनेज असल्याचा आरोप ते करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये २०० हून अधिक जागा मिळणार आणि पंढरपूर जिंकणार असा दावाही त्यांनी केला. आमचा विजय झाला की ईव्हीएम घोटाळा असतो. त्यांचा विजय झाला की सारं काही अलबेल असतं, असा चिमटाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. केजरीवाल-मोदी वादावरून लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्याच्या वृत्तावर अशी टीका करणाऱ्यांची कीव येते असे ते म्हणाले.
सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा..!
चंद्रकांत पाटील यांनी कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकांचं लोकार्पणही केलं. या दोन्ही कार्यक्रमांना मोठी गर्दी झाली होती. लोक एकमेकांना खेटून उभे होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मुंबई-पुण्यात कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी कडक निर्बंध लागलेले असताना राजकारण्यांना भरगच्च कार्यक्रम करण्यासाठी वेगळे नियम आहेत का ? असा सवाल या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारला जात आहे.