पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पवना धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून ५१० एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर २३ निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. यंदा उष्णता, पाण्याचा वापर वाढल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले होते. त्यातच जून महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे महापालिकेने दैनंदिन पाणीवापर अत्यंत काटकसरीने करावा. दैनंदिन पाणीवापर असाच सुरू राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर गेल्यास तीव्र पाणीटंचाई जाणवेल म्हणून महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महापालिकेनेही आणखी पाणी कपात करण्याचे नियोजन सुरू केले होते.
परंतु, १ जुलैपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. झपाट्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे वाढीव पाणीकपात टळली. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा झाला होता. ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. धरणातून पाण्याचा विसर्गदेखील करण्यात आला. आजमितीला धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
पवना धरण क्षेत्रात यंदाच्या वर्षी एकूण २१६६ मि.मी. पाऊस झाला आहे. तर धरणात सध्या ८.५१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहीती पाटबंधारे विभागाने दिली आहे.