पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणी मिळेल, याचे उत्तर आताच देता येणार नाही. पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत शहराला निघोजे येथून १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि.१५) सांगितले.
पवना धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे शहराला दररोज पाणी कधी मिळणार, असा प्रश्न लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून केला जात आहे. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, निघोजे, तळवडे येथून इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी पाणी चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणून ते शहराला पुरविले जाणार आहे. ते पाणी ऑक्टोबरच्या मध्यास उपलब्ध होईल. त्यामुळे पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुधारेल.
जलवाहिनी व पाण्याची टाकी अशा दोन प्रकारे शहरात दोन तुकडे करून पाणी पुरविले जात आहे. सर्व शहर जलवाहिनीने जोडण्यात येणार आहे. सध्या दोन दिवसांचे पाणी एका दिवसात पुरविले जात आहे.
भामा आसखेड पाणी योजनेसाठी किमान अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. आंद्रा व भामा आसखेड योजनेतून एकूण २६७ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. पाण्याचे स्त्रोत वाढविणे. तसेच, पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानंतर टप्पाटप्प्याने पाणीपुरवठ्यात सुधारणा केली जाईल. मात्र, आताच शहराला दररोज पाणी कधी मिळेल, याचे उत्तर देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पवना बंद जलवाहिनी मार्गी लावणार
अनेक वर्षांपासून बंद असलेली पवना बंद जलवाहिनी प्रकल्प सुरू करण्याबाबत मावळातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल. तसेच, राज्य शासनाकडे त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. योग्य तोडगा काढून तो प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटी प्रकल्प ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करणार
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने एबीडी आणि पॅन सिटीअंतर्गत विविध प्रकल्प सुरू आहेत. अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्याबाबत विचारले असता आयुक्त सिंह म्हणाले की, ‘स्मार्ट सिटीत विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यात अनेक किचकट मुद्दे आहेत. ३१ मार्च २०२३ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.