पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यातील सुमारे २० लाख कुटूंबियांच्या घरावर कारवाईची टांगती तलवार होती. हा प्रश्न सुटावा म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. आघाडी सरकारच्या काळात मी या प्रश्नासाठी अपक्ष आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी माझ्यावर अनेक आरोप झाले होते. मात्र मी प्रयत्न सुरू ठेवले होते. या प्रश्नासाठी माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावली असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बोलताना सांगितले.
राज्य सरकारने नुकताच संपूर्ण राज्यातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत बोतलाना भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे शासन लोकांना घरकुल देण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र लाखो लोकांना घरकुलापासून वंचित राहावे लागणार होते. राज्यात सुमारे २० लाख घरांवर कारवाईची टांगती तलवार होती. सरकारच्या या निर्णयामुळे यासर्व लोकांना मोठा आधार मिळाला आहे.
पुढे ते म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याने हा प्रश्न सुटावा म्हणून राजकीय कारकीर्द पणाला लावली होती. काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार असताना सातत्याने मी या प्रश्नासाठी पाठपुरावा करत होतो. मात्र तो प्रश्न त्या सरकारकडून सुटला नाही म्हणून मी माझ्या अपक्ष आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी माझ्यावर अनेक राजकीय आरोप करण्यात आले होते. मात्र या प्रश्नासाठी मी पाठपुरावा कायम ठेवला. माझ्यासह सर्व कार्यकार्त्यांनी जे स्वप्न पाहिले होते ते भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ते स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अखंड महाराष्ट्राला दिवाळीची गोड भेट मिळाली असल्याचे आमदार जगताप शेवटी बोलताना म्हणाले.