पिंपरी (Pclive7.com):- समाजाच्या जडणघडणीमध्ये क्रीडा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. शहराला राज्याला आणि देशाला उज्ज्वल भविष्य निर्माण करून देण्याचे काम त्याद्वारे होते. ज्ञानप्रबोधिनीच्या क्रीडाकूल विद्यालयाने आयुर्वेद क्रीडा परिषद आयोजित करून देशातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे, असे मत क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी केले.
ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकूलच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने आयुर्वेद व्यासपीठ आणि महाराष्ट्रीय मंडळ यांच्या सहयोगाने दोन दिवसीय राष्ट्रीय आयुर्वेद क्रीडा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीष बापट, प्राचार्य मनोज देवळेकर, वैद्य धनंजय कुलकर्णी, आगाशे महाविद्यालयाचे डॉ. महेश देशपांडे, आयुर्वेद व्यासपीठचे विलास जाधव, सागर देशपांडे, वैद्य मेधा देवळेकर, वैद्य उदय जोशी, स्मिता देशपांडे, वैद्य सचिन सरपोतदार, वैद्य योगिता जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
समारोपाच्या भाषणात डॉ. गिरीष बापट म्हणाले की, आयुर्वेद आणि चरक संहिता हा हिंदुस्थानचा हजारो वर्षांपूर्वीचा वारसा आहे. क्रीडाकूल मधील खेळाडूंना आयुर्वेद औषधी तसेच योगाभ्यास करून घेतला जातो. ऑलिंपिक पदक मिळवणारे खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनीने क्रीडाकूल शाळेची मुहूर्तमेढ रोवली. या माध्यमातून अनेक खेळाडू तयार होत आहेत. अशा प्रकारच्या शाळा देशाच्या प्रत्येक भागात सुरू झाल्या पाहिजेत. खेळाडूंची मानसिक शारीरिक जडणघडण होण्यासाठी आयुर्वेद व योग यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सबळ समाज निर्मितीसाठी आयुर्वेदाचा अवलंब होणे हिताचे आहे. ज्ञानप्रबोधिनी नवीन संशोधनातही अग्रेसर असून आयुर्वेदातील ‘सूक्ष्म आयुर्वेद’ या नवीन संकल्पनेवर संस्थेचे संशोधन सुरू आहे, असे डॉक्टर बापट यांनी सांगितले.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात तज्ज्ञांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी कशी काळजी घ्यावी, तत्काळ उपचार पद्धती, मानसिक आरोग्य आणि स्वस्थता यावर योगाभ्यास अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
परिषदेत २७ शोधनिबंध सादर..
परिषदेमध्ये संशोधकांनी सत्तावीस शोधनिबंध सादर केले. तसेच दहा चित्रकृती सादर केल्या. परिक्षकांनी निवडलेल्या शोधनिबंध व चित्रकृतीं मधून निवड झालेले संशोधक डॉ. दिव्यश्री के. एस., डॉ. रविना दळवी, डॉ. सानिका खोकले, डॉ. किरण मेंडेकर, डॉ. हरि शंकर, डॉ. अपुर्वा मुंडरर्गी यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी बहिरट, वैद्य दिप्ती धर्माधिकारी यांनी तर आभार बागेश्री देवकर यांनी मानले. महाराष्ट्रासह गोवा, केरळ, राजस्थान, पद्दुचरी या राज्यातील २५० वैद्य, डॉक्टर, क्रीडा प्रशिक्षक यांनी या परिषदेचा लाभ घेतला.
परिषदेत संमत करण्यात आलेले ठराव..
* आयुर्वेद क्रीडा परिषदेमध्ये वैद्य मेधा देवळेकर यांनी काही ठराव मांडले. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. हे ठराव केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.
* क्रीडा क्षेत्रात आयुर्वेद उपचार पद्धतीस मान्यता मिळावी.
* अधिक संशोधनासाठी केंद्र तसेच राज्य सरकार यांचे अनुदान मिळावे.
* क्रीडा क्षेत्रात आयुर्वेद उपचारांविषयी माहिती व जनजागृती व्हावी, यासाठी अभ्यासक्रम व प्राथमिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावेत.
* केरळ राज्याच्या धर्तीवर देशातील अन्य राज्यांमध्ये आयुर्वेद केंद्र सुरू करावेत.
* राज्यात जिल्हास्तरावर आयुर्वेद दवाखाने सुरू केले जावेत. यामध्ये खेळाडूंवर मोफत उपचार केले जावेत.
* प्रत्येक जिल्ह्यात क्रीडाकूल विद्यालय सुरू करावेत.