पिंपरी (Pclive7.com):- महापालिकेच्या चिंचवड येथील शाळेतील आठवी इयत्तेतील विद्यार्थी शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडला. यात त्याचा मृत्यू झाला. शाळेत सुरक्षेची पुरेशी खबरदारी न घेतल्यानेच ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे अमोल थोरात यांनी केली आहे.
अमोल थोरात यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. पत्रकात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील चापेकर चौकातील शाळेत शुक्रवारी (दि.१६) आठवीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शाळेच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील रेलिंगवर घसरगुंडी खेळताना पडल्याने गंभीर जखमी होऊन मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना असून, संबंधित विद्यार्थ्यांचे कुटुंब पूर्णपणे खचले आहे. त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. त्यासाठी महापालिकेने या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपायोजना करण्यात याव्यात. तसेच महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा विमा काढावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना आजारपणात उपचारासाठी मदत होईल तसेच दुर्दैवी घटना घडल्यास कुटुंबीयांना दिलासा मिळू शकेल.
महापालिका प्रशासनाच्या अनागोंदीमुळे अशा घटना घडत आहेत. वाकड येथे तीन मजली धोकादायक निर्माणाधीन इमारत कलल्यामुळे जमीनदोस्त करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे महापालिका प्रशासनातील व बांधकाम परवाना विभागातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली. त्यापाठोपाठ शाळेत तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याला पूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार आहे.
सर्जनशीलतेसाठी ‘जल्लोष शिक्षणाचा’, सुरक्षेसाठी काय?
विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागावी म्हणून महापालिका शाळांमध्ये ‘जल्लोष शिक्षणाचा’ उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम आवश्यकच आहेत. मात्र त्यासोबत विद्यार्थ्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त सिंह यांनी काय उपाययोजना केल्या, असा प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष..
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. तसेच सद्यस्थितीत शाळांमधील कॅमेरे बंद असल्याचे दिसून येते. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे . महापालिका प्रशासनाची उदासीन भूमिका याला कारणीभूत आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे.
महापालिका प्रशासनाला घटनेचे गांभीर्य नाही..
विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेणे अपेक्षित होते. घटनेबाबत माहिती कळविल्यानंतरही संबंधित अधिकारी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी येण्यास विलंब केला. त्यामुळे अधिकाऱ्यांना या गंभीर व दुर्दैवी घटनेचे गांभीर्य नाही, असे दिसून येते.
महापालिका आयुक्तच जबाबदार..
शाळेत सुरक्षेची खबरदारी घेतली नसल्यानेच विद्यार्थ्याच्या मृत्यू झाला. महापालिका प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा हा बळी आहे. याला महापालिका आयुक्त जबाबदार आहेत. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांच्यावर याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अमोल थोरात यांनी केली आहे.