पिंपरी (Pclive7.com):- घाटमाथ्यावर गेल्या तीन चार दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आज मंगळवार (दि.०८) सकाळी ५.३० वाजता धरणात ७७.८० टक्के इतका पाणीसाठा झाला असून धरणातून ३४०० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला.

पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये ७७.८० टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. आज (दि.०८) सकाळी ५ वाजताच्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्या करिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने २८०० क्युसेक्स मुक्त विसर्ग चालू आहे. तरी, आज सकाळी ६.३० वाजल्यापासून पाणलोट क्षेत्रातील येव्यानुसार सांडव्यावरील विसर्गामध्ये वाढ होऊन एकुण विसर्ग ३४०० क्युसेक्स इतका सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group