पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील डाई-ईची कंपनीच्या स्थलांतरास येथील कामगारांनी विरोध कायम केला आहे. सोमवारी प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारे रसायन गुजरात येथे पाठविण्यासाठी पोलीस बंदोबस्तात या साहित्याचे ट्रक पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतु इंटकचे जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालील सतर्क कामगारांनी हा डाव उधळून लावला.
कामगारांची उपासमार थांबवून कंपनी प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा, वेतन करार करून थकबाकी देण्यात यावी, निवृत्त कामगारांनाही त्याचे लाभ मिळावेत, नंतरच कंपनीतून प्रयोगशाळेचे साहित्य पाठविण्यास संमती देऊ, अशी भूमिका कैलास कदम यांनी घेतली. आवश्यक रसायनच कंपनीतून पाठवण्यात येत आहे, अशी कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे होते. मात्र, या वाहनांमध्ये प्रयोगशाळेतील रसायनाबरोबरच काही मशिनरीदेखील या वाहनांमध्ये असल्याचे कामगारांनी बंदोबस्तावरील पोलीस पथकाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे फक्त रसायनच पाठविणार असाल तरच आम्ही बंदोबस्त देऊ, अन्यथा आम्ही आपणास सहकार्य करू शकणार नाही अशी भूमिका भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी घेतली. अखेर कंपनी व्यवसथापनाने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे पोलीस तेथून निघून गेले.
डाई-ईची कंपनी व्यवस्थापनाने बेकायदा स्थलांतर सुरु केले आहे. याला कामगारांनी तीव्र विरोध केला आहे. २५ ऑगस्टपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर हिंद कामगार संघटनेच्या (इंटक) वतीने इंटकचे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या विरोधात हिंद कामगार संघटनेने न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. असे असूनही कंपनी व्यवस्थापनाने सोमवारी प्रयोगशाळेसाठी लागणारे आवश्यक साहित्य गुजरात येथे पाठविण्याची तयारी केली होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला.
कंपनीचे संचालक डॉ. संजय पुरव यांनी मशिनरी बाहेर पाठविली जात नसून केवळ रसायन पाठविण्यात येणार आहे, कोणत्याही कामगाराला कामावरून कमी केले जाणार नाही, चर्चेने कामगारांचे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन दिले. न्यायालयाची प्रत उपस्थित पोलीस अधिकारी, कंपनी व्यवस्थापनास दिली. यावर आम्ही संघटनेच्या व्यक्तिंशी चर्चा करणार नाही, अशी भूमिका व्यवस्थापनाने घेतली. त्यावर कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी, निवृत्त कर्मचारी यांची समिती तयार केली आहे, ते आपल्याकडे मागण्या मांडतील, त्यावर चर्चा करावी, नंतरच कंपनीतून संबंधित वाहने सोडावीत, अशी मागणी कदम यांनी केली. परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून निर्णायक प्रतिसाद मिळाला नाही.