पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदीवरील सांगवी–बोपोडी पुलावरील विद्युत रोषणाई व सुशोभीकरण या कामाचे लोकार्पण व नामकरण
पिंपरी (Pclive7.com):- मुळा नदीवरील सांगवी–बोपोडी दरम्यान असलेल्या विद्यमान पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण करण्यात आले असून, पुलावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व सुशोभीकरणामुळे या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आकर्षक वातावरणात प्रवासाचा अनुभव मिळणार असून, शहराच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुळा नदीवरील सांगवी–बोपोडी पुलावरील विद्युत रोषणाई व सुशोभीकरण या कामाचे लोकार्पण तसेच पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, नगरसदस्य नवनाथ जगताप,हर्षल ढोरे,राजू बनसोडे, प्रभाकर वाघेरे, नगरसदस्या दिप्ती कांबळे, उज्ज्वला ढोरे, पल्लवी जगताप, शकुंतला धराडे, सुषमा तनपुरे, माजी नगरसदस्य संतोष कांबळे यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सरकार शितोळे यांच्या कुटुंबातील निलीमा नितीन शितोळे, नेहा शितोळे पवार, नकुल शितोळे, शिवराज शितोळे आदी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘विद्यमान पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आणि त्यांना आधुनिक रूप देणे हे महापालिकेचे धोरण आहे. ‘सरकार शितोळे सेतू’च्या सुशोभीकरणामुळे केवळ पुलाचा दर्जाच उंचावला नाही, तर शहराच्या सौंदर्यवृद्धीलाही चालना मिळाली आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडून येत असून, भविष्यातही अशा प्रकल्पांवर भर दिला जाईल, असे देखील ते म्हणाले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहरातील विद्यमान पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण व देखभाल यावर महापालिका विशेष भर देत आहे. पुलावरील सुशोभीकरण आणि रोषणाईमुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार असून, शहराच्या शाश्वत विकासासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी केले. ते म्हणाले, सांगवी–बोपोडी परिसरातील हा महत्त्वाचा पूल आता ‘सरकार शितोळे सेतू’ या नावाने ओळखला जाणार असून, त्याच्या सुशोभीकरणामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम राबविणे हे आमचे ध्येय असून, यापुढेही विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगतानाच त्यांनी सदर विकासकामाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.



















Join Our Whatsapp Group