पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ.शितल नाना काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे गेली अनेक वर्षे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आज अखेर यश आले आहे. राजमाता जिजाऊ उद्यानात आज सकाळी २० दश लक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
नगरसेवक नाना काटे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सध्या पिंपळे सौदागर गावठाणातील एकाच टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षापूर्वी लोकसंख्या जेवढी होती त्याच्या दुप्पट तिप्पट लोकसंख्या वाढलेली आहे. पण पाणी पुरवठ्यात काही वाढ झाली नाही. त्यामुळे साहजिकच पाणी प्रश्न गंभीर बनत चाललेला होता. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून आपण नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी महापालिका आयुक्ताकडे वारंवार पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर एक वर्षापूर्वी अमृतयोजने अंतर्गत या टाकीची निविदा मंजूर करण्यात आली. पण कामाला काही सुरुवात करण्यात आली नव्हती. पाणीप्रश्न अधिक जटील होत असल्यामुळे दि.०३ जानेवारी रोजी पालिका आयुक्तांना पत्रकाद्वारे या टाकीच्या कामामध्ये कुणाचा स्वार्थ लपलेला आहे का? असा जाब विचारून सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामुळे आज अखेर या टाकीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले असल्याचे नाना काटे यांनी म्हटले आहे.
या पाण्याच्या टाकीची उंची २१ मीटर असून अंदाजित खर्च १ कोटी २३ लाख रुपये आहे. टाकी बांधण्यासाठी मे.अरिहंत कंट्रक्शन या ठेकेदारला दिलेले आहे. टाकी पूर्णत्वाची तारीख जानेवारी २०२० पर्यंत आहे. या टाकीवरून वाकड – भोसरी बीआरटी एस रोड ते काटेवस्ती रोड, गणेशम फेज १, साई आर्केट, रोझआयकॉन, ट्रेजरी बेत, लक्षदीप पँलेस, प्लानेट मिलेनियम सोसायटी, साई व्हिजन, साई अँबीयंस सोसायटी या परिसराला पाणीपुरवठा होणार आहे.
तसेच यावेळी रहाटणी येथील रामनगर येथील अमृत योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन ही करण्यात आले. या प्रसंगी सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, माजी नगरसेवक शंकर काटे आदी उपस्थित होते.
पिंपळे सौदागर मधील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचे नाना काटे यांनी म्हटले आहे.