पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात कचरा समस्या निर्माण होण्यास राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असून, त्यांनी करून ठेवलेली घाण काढण्यास आमचा वेळ खर्ची पडत आहे. मात्र, अनेक वर्षापासून रखडलेला शहराचा दोन भाग करून कचरा संकलनाचा ठेका अखेर भाजपने मार्गी लावली आहे, असे प्रत्युत्तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शुक्रवारी (दि.२) दिले.
विरोधी पक्षनेतेपदावर निवड झाल्यानंतर नाना काटे यांनी गुरूवारी (दि.१) सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. एकनाथ पवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते पदासाठी नाना काटे हे अनेक महिन्यांपासून गुघड्याला बाशिंग बांधून बसले होते. अखेर त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची मिळाली आहे. प्रसिद्धीसाठी बोलायचे म्हणून ते भाजपवर उठसूठ टीका करीत आहेत, असे टीका पवार यांनी केली.
कचरा समस्या ही राष्ट्रवादीच्या काळापासून आहे. सदर निविदा प्रक्रियेबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी न्यायालयात गेल्याने आणि सातत्याने तक्रारी केल्याने ही प्रकिया रखडली. भाजपने या निविदेस चालना देऊन आर्थिक बचत करीत शहराचे दोन भागांनुसार कचरा संकलन व वाहतूक कामास १ जुलैपासून सुरूवात केली आहे. कचर्यासंदर्भातील तक्रारीची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. सत्ताधार्यांसह महापालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छतेकडे प्राधान्य दिले जात आहे. बेस्ट सिटी स्मार्ट करण्यावर भाजपचा प्रयत्न आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शेतकर्यांवर गोळीबार केल्याने पवना बंद जलवाहिनी योजना गेल्या ८ वर्षांपासून रखडली आहे. त्यासंदर्भात शेतकर्यांशी अनेक बैठका घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक तोडगा काढत आहेत. हा प्रश्न विधानसभा निवडणुकीनंतर मार्गी लावला जाईल. शेतकर्यांच्या सहमतीने हा प्रश्न केवळ भाजप सोडविणार आहे, असा दावा पवार यांनी केला.
शास्तीकर लागू करण्याचा निर्णय ही राष्ट्रवादीने नागरिकांच्या माथी मारला आहे. भाजपने आतापर्यंत हा ९० टक्के प्रश्न सोडविला आहे. उर्वरित प्रश्नही सोडविण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत, असे पवार यांनी सांगितले. तब्बल ३५ वर्षे रखडून ठेवलेला प्राधिकरणातील साडेबारा टक्के परतावाचा प्रश्न भाजपने मार्गी लावला आहे. त्यावर विनाकारण शंका उपस्थित करण्याचे काम राष्ट्रवादीची मंडळी करीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
शहरातील तसेच, प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे ठोस पाऊल भाजपने उचलले आहे. केवळ आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाना काटे याच्यासारखी मंडळी भाजपवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांना शहरातील नागरिक भिक घालणार नाहीत, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. पालिकेतील सत्ता गेल्याने विरोधी पक्ष हाताश झाला आहे. त्यांच्याकडे विकासाचे कोणतेच मुद्दे शिल्लक न राहिल्याने जुनेच मुद्दे उकरून काढून ते आपले अस्तित्व निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असे टिकास्त्र पवार यांनी सोडले.
केंद्रात, राज्यात व पालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असताना त्यांना येथील प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यामुळे करदात्यांना आर्थिक भुर्दड सहन लागला आहे. हे सर्व टाळण्यासाठी भाजपने सातत्याने प्रयत्न केले आहे. महापालिका निवडणूक दिलेली आश्वासने भाजपने पाळले आहेत, त्या मुळे नाना काटे यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नसल्याचे पवार म्हणाले.