पिंपरी (Pclive7.com):- एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख होती. मात्र या निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळाचे बारा वाजलेत. महायुतीच्या विरोधात चिंचवड आणि भोसरी उमेदवारच यांना मिळाला नाही. त्यामुळे समजत नाही लढायचे तरी कोणाबरोबर, समोर कुणीचं दिसत नाही. असं सांगत या निवडणुकीत महायुतीचे तीनही उमेदवार ‘रेकॉर्ड’ मतांनी विजयी होणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रहाटणी येथे व्यक्त केला.
चिंचवड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारा निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा रहाटणी येथे संपन्न झाली. यावेळी चिंचवड विधानसभेचे उमेदवार लक्ष्मण जगताप, पिंपरीचे गौतम चाबुकस्वार, भोसरीचे उमेदवार महेश लांडगे, मावळचे उमेदवार बाळा भेगडे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, महापौर राहुल जाधव, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अमोल थोरात तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दहा-बारा दिवसांवर निवडणूक आली आहे. मात्र मला समजत नाही चिंचवड आणि भोसरीत लढायचं कुणाच्या विरोधात? आमच्या विरोधात समोर कुणीच दिसत नाही. पिंपरी चिंचवड प्रमाणेच राज्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अशीच परिस्थिती आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पिंपरी चिंचवड शहराची ओळख होती. मात्र येथे महायुतीच्या विरोधात त्यांना उमेदवार सापडले नाहीत. पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरश: घड्याळाचे बारा वाजलेत. उमेदवार न मिळण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. तीनही जागेवर महायुतीला अभूतपूर्व विजय मिळणार यात कुठलीच शंका नाही. खरंतर या निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पराभव स्वीकारला आहे. त्यांच्या वचननाम्यात कुठलाच दम नाही. हवी तेवढी आश्वासने देऊन टाकलीत. केवळ प्रत्येक मतदाराला ताजमहल बांधून देतो, एवढचं आश्वासन त्या वचननाम्यात देण्याचे बाकी आहे. असं सांगत मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीच्या वचननाम्याची खिल्ली उडवली. विरोधकांना आता माहिती आहे, पुढचे वीस ते पंचवीस वर्षे त्यांना आता विरोधातच बसायचा आहे. भविष्यात विरोधी पक्षनेता बनवायलाही त्यांच्याकडे १० टक्के आमदार मिळणार नाहीत.
गेल्या पाच वर्षात देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदी यांनी परिवर्तन घडवून आणले. जनतेचा विश्वास आता पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. गेली अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्न प्रलंबित होते. स्वतः शरद पवार मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असताना देखील ते हे प्रश्न सोडवू शकले नाहीत. परंतू भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर आम्ही प्रथम स्वतंत्र पोलीस आयुक्तालय उभे करून दाखवून. गेली दहा-पंधरा वर्षात राष्ट्रवादी हे करू शकले नाही. स्मार्ट सिटीत पिंपरी चिंचवडचा समावेश करून पूर्णपणे शहराचा कायापालट केला जाणार आहे. पिंपरी चिंचवडकरांवर राष्ट्रवादी काँग्रेसने शास्तीकर लादला होता. मात्र या शास्त्रीकराच्या जुलमातून येथील नागरिकांना मुक्त करण्याचे काम भाजप सरकारने केले. सध्या मेट्रोचं काम शहरात वेगाने सुरू आहे. पीएमपीएलच्या ताफ्यात अनेक एसी बसेस दाखल केल्यात. इलेक्ट्रिक बसही रस्त्यावर धावत आहेत. शहरात ग्रेड सेपरेटर उड्डाणपूल यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे येत्या काळात शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. वाहतूक कनेक्टिविटी वेगाने झालेली भविष्यात दिसून येईल. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. भामा आसखेड धरणीतून पाणी शहरवासीयांना मिळवून दिले. आंध्रा धरणातून १०० एमएलडी पाणी मिळवून दिले. अमृत योजनेतून २७५ कोटी या शहराला दिले. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणी टाक्यांचे काम जोमाने सुरू आहे. पवना बंद पाईप योजनेसंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून भविष्यात लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे पुढील पन्नास वर्षाकरीता पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे. शहराततील कचरा प्रश्न सोडवला, प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न केला. नदी संवर्धन प्रकल्प हातात घेतला. शहरात १३ हजार घरांचे काम सध्या सुरू आहे. झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा भाजप सरकारचा मानस आहे. प्रत्येक गरजूला घर मिळालेच पाहिजे. त्यासाठी जो काही निधी लागेल तो राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या पाच वर्षात महाराष्ट्र रसातळालातून बाहेर काढण्याचे काम भाजप सरकारने केलं आहे. शिक्षणाचा स्तर वाढला आहे. राज्यात गुंतवणूक वाढली. उद्योगधंद्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आलायं. रोजगार वाढला, देशात सर्वाधिक रोजगार मिळवून देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर गणला जातो. महाराष्ट्र बदलतो, मोदींच्या नेतृत्वात देश बदलतोय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मजबूत राष्ट्र उभे रहात आहे. जम्मू कश्मीरचा 370 कलम रद्द करून दाखवलं. त्यामुळे ७० वर्षानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकू शकला. बलशाली राष्ट्र मोदींच्या नेतृत्वात तयार होत आहे, सोबतच समृद्ध महाराष्ट्र तुम्हाला तयार करायचे आहे. पूर्णपणे विश्वास आहे की, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी या तिन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील. मात्र रेकॉर्ड मतांनी त्यांना निवडून द्या आमचं ठरलं पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत महायुतीचे उमेदवार रेकॉर्ड मतांनी विजयी होणार असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.