मुंबई (Pclive7.com):- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे येत्या ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे, समुद्रात वाऱ्याचा वेगही जास्त असल्याने मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे विभागातील सर्व जिल्हा यंत्रणांना उपाय-योजनेसह तयारीत राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने मच्छीमार बोटी पुन्हा समुद्रकिनारी विसावल्या जाणार आहेत. पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकं सडली आहेत. द्राक्षांच्या बागा, भात पिक, ज्वारी, सोयाबिन पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे. हाता-तोंडाशी आलेलं पिकं असं वाया गेल्याने बळीराजा कोलमडला आहे. आता पुन्हा हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उरलेल्या पिकाची धास्ती निर्माण झाली आहे.