यदा यदा हि अधर्मस्य.. ग्लानिर्भवती भारत.. जणू अशीच परिस्थिती निर्माण झाली असताना शरद पवार साहेबांच्या रूपाने पुन्हा एकदा ही परिस्थिती बदलून टाकणारा अवतार महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्याने जन्माला आला. आणि त्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले, अस्वस्थ, अराजक आणि पिळवटून, पिचून गेलेल्या लोकमानसात अंगार फुलवला निखार्यावरची राख झटकली आणि अंगार चेतवला. शरद पवार ही व्यक्ती नव्हे तर विचार आहे आणि तो एखाद्या वादळाप्रमाणे घोंगावला. तमाम समाजमनाला दिलासा आणि विश्वास दिला.
काय होतं चित्र अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ? धर्मांध शक्ती जणू ताम्रपट घेऊन आल्याच्या थाटात आणि अविर्भावात दंभाने पछाडल्या होत्या, त्या दंभाला उचकटून, विस्कटून टाकण्याचे काम पवार साहेबांनी केले, अगदी एकहाती केले, शरद पवार या शक्तीने ते घडवून दाखवले, जेव्हा सारं संपलं असं वाटतं तेव्हा परिस्थिती कशी बदलायची याचा आदर्श निर्माण केला, लढण्याची जिद्द काय असते आणि या जिद्दीने जिंकायचे कसे असते ते दाखवून दिले. प्रबळ इच्छाशक्तीला सामूहिक स्वरूप दिलं तर काय घडू शकते हेच पवार साहेबांनी दाखवून दिले.
शरद पवार यांच्या लोभस नेतृत्वाकडे आकर्षित होऊन राजकारणात दाखल झालेल्या पिढीचा मी प्रतिनिधी. वयाच्या २५ व्या वर्षी साहेब आमदार आणि अवघ्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. १९६७ साली महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उगवलेलं साहेबांचे नेतृत्व आजही दिमाखाने तळपत आहे. एवढा प्रदीर्घ पट तोही अत्यंत संघर्षमयी तरीही यशस्वी लाभला नव्हे नव्हे स्वतःच्या कर्तबगारीने निर्माण केला आणि जिंकला तो साहेबांनी. महाराष्ट्राला स्वतःच्या तळहातावरील रेषांप्रमाणे ओळखणार्या साहेबांनी इथला माणूस वाचलाय, इथली परिस्थिती आणि प्रश्न जाणलेत म्हणूनच त्यांच्या हाती या राज्याचा लगाम पुन्हा एकदा हाती आलाय.
साहेबांनी केवळ महाराष्ट्रच घडवला नाही तर भारत उभारणीत योगदान दिलं आहे. ते योगदान नाकारण्याचा करंटेपणा करणारे कमी नाहीत पण अशांची फिकीर त्यांनी कधीच केली नाही म्हणूनच ते आज एका तेजस्वी सुर्याप्रमाणे तळपत आहेत. फार लांबचे कशाला सांगत बसायचे आपल्या पिंपरी चिंचवड शहराला घडवण्यात त्यांनी दिलेलं योगदान सार्या जगासमोर लख्ख उदाहरण आहे. मातीची मूर्ती, दगडाचा देव करन्याचं काम त्यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलून केलं.. तो चेहरा विद्रुप होणार नाही याची काळजी घेतली, अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर टाटा कंपनी येथुन निघून जातेय की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना साहेबांनीच ती टिकवली, मोठी बिकट व भयानक परिस्थिती त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळली, हे फार मोठे उपकार आहेत त्यांचे. अन्यथा त्यावेळी काही उलट घडलं असतं तर आज ज्या आंततरराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर इथं दिसतायत त्या दिसल्या नसत्या किंबहुना उद्योग जगताने पिंपरी चिंचवडकडे पाठ फिरवली असती, जे आत्ता पवार साहेबांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करतायत त्यांचा तेव्हा जन्म पण झाला नव्हता.
पवार साहेबांनी महाराष्ट्र घडवला तो असा. आज महाराष्ट्र पुन्हा एकदा नव्या जोमाने झेपावण्यास सज्ज आहे कारण त्याच्या पंखात बळ भरण्याचे काम साहेब करत आहेत आणि अशा कर्तबगारीला वयाचा कसला आलाय अडसर? वय हा मुद्दा अशा लोकोत्तर व्यक्तींच्या बाबतीत गैरलागू ठरतो जसा की तो साहेबांच्या बाबतीत ठरलाय.. साहेबांनी कायम पुढच्या पाच पन्नास वर्षांचा विचार केलाय, म्हणूनच सुप्रियाताई सुळे यांचा राजकारणातील प्रवेश हा काही एका दिवसाचा नाही, सुप्रियताईंनी आधी अनेक वर्षे महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रात काम केलं, विशेषतः उपेक्षित, वंचितांच्या प्रश्नावर त्यांनी योगदान दिलं, लोकांच्या प्रश्नांची नड व निकड समजून घेतली आणि मगच त्या राजकारणात आल्या. त्यामुळेच संयम आणि अभ्यास हे दोन्ही गुण त्यांच्या तळमळीतून दिसून येतात. सुप्रियाताईंप्रमाणे साहेबांच्या विचाराची शिदोरी घेऊन अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहेत. किती अडचण आली तरी आपला विचार, आचार सोडायचा नाही. साहेब हे महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. तेच महाराष्ट्रातील जनतेचे कैवारी आहेत. हे ज्यांना उमगले त्यांनी कधीही साहेबांच्या विचाराबरोबर प्रतारणा केली नाही. अनेक जण पक्ष सोडून जात असताना काही नेत्यांनी त्यांची खंबीर साथ दिली यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल तो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा. साहेबांच्या हाकेला साथ देत त्यांनीही महाराष्ट्रात पक्ष वाढीबरोबर साहेबांचा विचार तळागळापर्यंत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचविण्यासाठी काम जोमाने केले. अवघ्या महाराष्ट्राने साहेबांना परिवर्तनासाठी साहेबांना साथ दिली.
मात्र ज्या पिंपरी चिंचवडला गतवैभव प्राप्त करून देण्यात पवार साहेब व अजितदादांनी मोलाची कामगिरी केली. त्या पिंपरी चिंचवडकरांनी मात्र निराशा केली. साहेबांच्या हाकेला महाराष्ट्राने साद दिलीय पण दुर्दैवाने पिंपरी चिंचवड त्या प्रतिसादात अपेक्षित ताकदीने सरसावली नाही, हे दुर्दैव म्हणावं लागले. आज महाराष्ट्राच्या पटलावर शरदसूर्य उगवला असताना त्या प्रकाशाच्या किरणांमध्ये इथली आणखी काही किरणं असती तर त्याच्या प्रकाशाचा फायदा या शहरालाच अधिक झाला असता. पुण्याच्या तुलनेत वाढलेले पिंपरी चिंचवड शहर स्वछ पाणीपुरवठा, प्रशस्थ रस्ते, मूलभूत सोयी सुविधा, आयटी हब, औद्यागिकनगरी व उड्डाणपुलाचे शहर म्हणून पिंपरी चिंचवडला नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न केले ते पवारसाहेब व अजितदादांच्या कर्तबगारीमुळेच. शहरातील नागरिकांच्या रहाणीमानाचा दर्जा वाढविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन व घरकुल योजना महाराष्ट्रात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्णत्वास गेली नाही ती फक्त या शहराने पूर्ण करून दाखवली. त्याला कारण पवारसाहेब यांचं विकासाचं समाजकारण होय. या शहरातील प्रगती भारतातील इतर शहरांना लाजवेल अशीच झाली. मात्र राजकारणाचे फासे पालटले आणि नको त्या व्यक्तीच्या हातात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या गेल्या. महाराष्ट्राला दिशा देणारं हे शहर दुर्दशेच्या गर्तेत बुडालं. कोणतेही विकासाचं काम न करता फक्त महापालिकेची तिजोरी खाली करण्याचे काम इथल्या सत्ताधारी नेत्यांनी केलं. सत्ता कोणाकडेही असो पण विकासाची प्रक्रिया थांबता कामा नये, गतिमान व सर्वांगीण विकास या शहरात थांबला इथला नागरिक आज भितीच्या गर्तेत सापडला आहे. जातीयवादी विचारधारा बाळगणार्या पक्षाच्या नेत्यांनी शहराला किमान वीस वर्ष मागे नेवून ठेवण्याचे पाप केले आहे. त्याला कारणही राष्ट्रवादी काँग्रेस च्या स्थानिक नेत्यांची अनास्था. या सर्वांना पक्षाने पदे दिली, ताकद दिली, पण इथल्या नेत्यांनी आदरणीय पवारसाहेब व पक्षाला काय दिले याबाबत विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. झाले गेले विसरून नव्या जोमाने पुढे येऊन फक्त साहेबांसाठी तरी एकजुटीने पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा नव्याने पक्षाची एक हाती सत्ता आणण्यांसाठी सर्वांनी मतभेद विसरून सर्वांनी एकदिलाने काम करून २०२२ मध्ये होणार्या महापालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा मानस करणे करुन ते सत्त्यात उतरविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास खर्या अर्थाने पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा केल्याच सार्थकी लागेल. परिवर्तनाची नांदी साहेबांनी सुरु केली आहे आता फक्त आपण पुढे सरसावण्याची वेळ आली आहे. राज्यात परस्थिती बदलणार नाही असा सर्वांचा ठाम विश्वास होता. मात्र साहेबांनी बदल घडविला. त्यामुळे साहेबांनी दाखविलेला आत्मविश्वासावर महाराष्ट्राने विश्वास ठेवला. त्यातून पिंपरी चिंचवड शहरात ही बद्दल घडेल. धीरोदत्त योद्धा असलेल्या साहेबांचा विचार हा लोककल्यानाचा आहे. म्हणूनच साहेबांची प्रतिमा महाराष्ट्राच्या हृदयात आणि देशाच्या नजरेत सदैव आहे. माझ्या घरातील देव्हार्यात म्हणूनच ३ पिढ्या साहेबांची प्रतिमा पुजली जाते कारण त्यांनी या महाराष्ट्रासोबत या शहराला घडवलं आणि या शहराचा मी नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..
प्रथम आमदार विलास लांडे, भोसरी विधानसभा मतदारसंघ
(पिंपरी चिंचवड)