शिशिर व्याख्यानमालेचे उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- शहरी माओवाद हा जंगलातील माओवादापेक्षा देशासाठी अधिक घातक आहे. माओवाद संपवणे हे आपल्या देशासाठी एक मोठे आव्हान आहे. हे विचारधारेचे युद्ध आहे. विचारानेच ही लढाई लढावी लागेल. ह्याचा अर्थ पोलिसांचे एन्काऊंटर गरजेचे नाहीत असा नाही. माओवाद्यांच्या सशस्त्र कारवायांना पोलीस आणि CRPF चे जवान सशस्त्र कारवायांनी उत्तर देतील. परंतु ,माओवादी विचारधारा लोकशाही व संविधान विरोधात कशी चुकीची आहे. हे जोपर्यंत सर्वांना कळत नाही तोपर्यंत ही लढाई जिंकू शकत नाही. असे मत कॅप्टन (नि) स्मिता गायकवाड यांनी मांडले. रोटरी क्लब ऑफ़ चिंचवडच्या वतीने आयोजित केलेल्या शिशिर व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी ” शहरी नक्षलवाद” या विषयावर त्या बोलत होत्या.

या व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी रोटरीचे प्रांतपाल रवी धोत्रे, चेतना नागरीक मंचाचे अध्यक्ष ले. कर्नल (नि) बाबूराम चौधरी, रोटरी क्लब ऑफ़ चिंचवडचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, सचिव प्रवीण गुणवरे, प्रकल्प प्रमुख संजय खानोलकर आदी उपस्थित होते. कॅ.गायकवाड पुढे म्हणाल्या कि, खऱ्या आंबेडकरवादी संघटना बाबासाहेबांचे संविधानवादी विचार पुढे घेवून जाण्यासाठी कार्य करतात. तर माओवादी संघटना संविधान व लोकशाही उलथून टाकण्याचे काम करीत आहेत. एल्गार परिषद प्रकरणात आरोपींच्या विरोधात माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे पुरावे असल्याचे विधान पुणे कोर्ट तसेच सुप्रीम कोर्टानी सुद्धा केले. तरीदेखील आपल्याकडील काही राजकीय नेते नागरिकांचा बुद्धिभेद करणारी वक्तव्य करीत आहे.
शहरी माओवाद्यांना लोकशाही उलथवून टाकत बंदुकीच्या जोरावर राजकीय सत्ता हवी असते . नागरिकांच्या मनावर व बुद्धीवर नियंत्रण मिळवून सत्ता काबीज करणे हा त्यांचा हेतू असतो. शहरी नक्षलवाद्यांमध्ये उच्चशिक्षित व बुद्धिवादी लोकांचा समावेश आहे. हे शिक्षित माओवादी जंगलातील माओवाद्यांना घडवतात. हिंसक कारवाया करणाऱ्या ह्या दहशतवादी कामाला ते क्रांती म्हणतात. माओवाद्यांचे समर्थन करणारे लेखन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. मात्र माओवाद्यांच्या विरोधात त्यांचे खरे रूप दाखवणारे लिखाण झाले पाहिजे. माओवाद्यांच्या कुकर्मांमुळे होणारे नुकसान समाजाच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे. अशी अपेक्षा व्यक्त करीत पुढे त्यांनी चीनमधील माओ ह्या हुकुमशाही आणि हिंसेवर विश्वास असणाऱ्या नेत्याच्या विचारधारेचे अनुकरण करणे म्हणजेच माओवाद असे सांगितले. पश्चिम बंगालमध्ये नक्षलबाडी हे गाव आहे या गावावरून नक्षलवाद हे नाव पडले.
शासनाने दंडकारण्य भागात त्या काळी आवश्यक विकास केला नाही हे सत्य आहे. पण त्यामुळे माओवाद सुरू झाला असे नाही. त्यामुळे माओवाद्यांचे काम सोपे झाले. माओवाद्यांनी विकासासाठी स्वतः काहीच केले नाही आणि सरकार करत असलेल्या विकासात अडथळा मात्र निर्माण केला. यावेळी सीपीआय (माओवादी), कबीर कला मंच, रिपब्लिकन पॅंथर्स या संघटनांवर तसेच रिपब्लिकन पँथर पसरवत असलेल्या ‘रॅडिकल आंबेडकर’ ह्या विचारसरणीवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा गोडसे यांनी केले तर आभार महावीर सत्यान्ना यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group