पिंपरी (Pclive7.com):- ‘नागरिकत्व संशोधन कायदा’ (CAA) हा कुठल्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेत. मात्र कुठेतरी जाणीवपूर्वक मुस्लिम बांधवांच्या विरोधात हा कायदा अाहे, अशी भिती दाखवली जात आहे. मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे असे वातावरण विरोधक निर्माण करत आहेत. परंतू भाजपा कधीच मुस्लिम विरोधी नव्हता आणि यापुढेही नसणार आहे. देशहितासाठी ‘नागरिकत्व संशोधन कायदा’ आवश्यक असल्याचे मत भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ‘नागरिकत्व संशोधन कायदा (CAA)’ या कायद्यासंदर्भात जनजागृती व्हावी व सर्व समाजातील भ्रम दूर व्हावेत याकरिता पिंपरी कँम्प मधील बी.टी.अडवाणी धर्मशाळेत आयोजित मेळाव्यात आज ते बोलत होते. यावेळी भाजपाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, पक्षनेते एकनाथ पवार, जेष्ठनेत्या उमा खापरे, नगरसेवक संदीप वाघेरे, मोरेश्वर शेडगे, राजेश पिल्ले, दादा पमनाणी, ज्योतिका मलकानी तसेच मोठ्या संख्येने सिंधी बांधव उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना विनोद तावडे म्हणाले की, पाकिस्तान-बांगलादेश मधून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व देण्याचा विचार काँग्रेसने सत्तेत असताना कधीच केला नव्हता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी याबाबत विचार करून ‘नागरिकत्व संशोधन कायदा’ आणला आहे. मोदी सरकारचे चांगले काम विरोधकांना पहावत नाही. कुठेतरी जाणीवपूर्वक मुस्लिम विरोधी हा कायदा आहे अशी भीती दाखवली जात आहे. मोदी सरकार मुस्लिम विरोधी आहे असे वातावरण निर्माण केले जाते. मात्र भाजप मुसलमान विरोधी कधीच नव्हता, आणि यापुढेही नसणार आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती ही भाजप सरकारनेच केली होती. जगभरातून कोणी हिंदू निर्वासित होत असेल तर भारत सरकारने त्याला नागरिकत्व देणे चूक नाही. पिंपरीतील सिंधी समाजाने फाळणीच्या वेळी अनेक नातेवाईकांचे बळी गेलेले पाहिले आहेत. आता जर कोणी नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहिले असतील आणि त्यांना तिथे त्रास होत असेल तर नक्कीच या नागरिकत्व कायद्यामुळे ते आपल्या देशाचे नागरिक होऊ शकणार आहेत. सध्या बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे देशातील रोजगार कमी होत चालला आहे.म्हणून ही घुसखोरी थांबवण्यासाठी नागरिकत्व कायदा आवश्यक आहे. हा कायदा कुठल्याही जाती-धर्मा विरोधात नाही. देश एकसंघ राहण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. मोदी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. मात्र त्याला खुलाविरोध करू शकत नसल्याने विरोधक अशाप्रकारे समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या चांगल्या निर्णयाचे समर्थन केलेच पाहिजे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन विनोद तावडे यांनी उपस्थितांना केले.
या मेळाव्यानंतर विनोद तावडे यांच्या नेतृत्वात नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनासाठी पिंपरी कँम्पात पदयात्रा काढण्यात आली. तसेच तावडे यांनी पिंपरीतील गुरूद्वाराला भेट दिली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले. तर सुत्रसंचालन वैशाली खाड्ये यांनी केले