- संदेश पुजारी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या नेतृत्वात भाजपा पहिल्यांदाच सत्तेत आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या २५ वर्षातील साम्राज्य खालसा झाले. सत्तेत आल्यानंतर गेल्या ३ वर्षात पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल स्मार्टसिटीच्या दिशेने केल्याचा दावा भाजपच्या कारभाऱ्यांकडून होतोय. तर भाजपाने शहराचा विकास रोखून केवळ भ्रष्टाचारी कारभार केला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
‘नको बारामती, नको भानामती’, ‘सबका साथ-सबका विकास’चा नारा देत भाजपाने फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली. गेल्या २५ ते ३० वर्षापासून पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘सत्तेत धुंद’ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ‘मस्ती’ उतरवली. शहराचा सर्वांगिण विकास करूनही केवळ ‘अतिआत्मविश्वासा’मुळे त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. मात्र पहिल्यांदाच महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाने स्पष्ट बहुमत मिळून देखील शहरवासियांची घोर निराशा केली असल्याचा आरोप होत आहे. महापालिकेच्या गेल्या ३ वर्षाच्या कारभारात विकासाची कामे कमी अाणि भ्रष्टाचाराचे आरोपच जास्त झाल्याने भाजपाची प्रतिमा पूर्णपणे डागळली असल्याचे चित्र आहे.
गेल्या २५ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या माध्यमातून या शहरात रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, मुबलक पाणी, नाट्यगृह, शाळा, हॉस्पिटल असा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीच शहराचा विकास केला असल्याचे विरोधकांनी देखील अनेकदा जाहीररीत्या मान्य केले होते. मात्र शहराचा सर्वांगीण विकास करूनही केवळ भ्रष्टाचाराच्या ‘पोकळ’ आरोपांमुळे २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. शहरवासीयांनी परिवर्तनाला साथ देत राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला. पहिल्यांदाच महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र शहरातील सरसकट शास्तीकर माफीचा प्रश्न, २४ तास पाणी, कचरा समस्या, सक्षम वाहतूक व्यवस्था, सुसज्ज रस्ते या मुलभूत समस्या सोडविण्यात गेल्या तीन वर्षात सत्ताधारी भाजपा सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. सत्तेत आल्यानंतर नव्या-जुन्याचा वाद भाजपला मोठा डोकेदुखीचा ठरला. तर राष्ट्रवादीचीच ‘बी’ टीम असल्याच्या टिकेने तर भाजपात कमालीची अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत होते. त्यामुळेच अगदी पहिल्या वर्षापासून ४५० कोटींच्या रस्त्यांची निविदा, कचऱ्याचे टेंडर, पंतप्रधान आवास योजना, वायसीएममधील भरती, रूग्णालये खाजगी करण्याचा ‘घाट’ ही प्रकरणे भाजपच्या ‘आंगलट’ आली. त्यात भर पडली ती म्हणजे, भाजपाचेच खासदार अमर साबळे यांनी महापालिकेतील कारभारात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारीची, खासदार साबळे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या संशयामुळे निविदा रद्द करण्याची नामुष्की देखील या सत्ताधाऱ्यांवर ओढवली होती. त्यानंतर ठराविक पदाधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पक्षच बदनाम झाल्याचे अनेक निष्ठावंत खाजगीत अाजही बोलून दाखवत आहेत.
गेल्यावर्षी धरणात पाणी साठा मुबलक असून देखील दिवाळीपासून शहरवासीयांवर एकदिवसाआड पाणीकपात लादण्यात आली. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक पूर्णपणे कोलमडली. शहरातील प्रत्येक भागात रस्त्याची कामे सुरू असून गेल्या वर्षभरापासून सर्वत्र खोदाई केल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यात आता मिळकतकरात देखील वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शहरातील कचऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. ‘नियोजनशून्य’ कारभारामुळे संपूर्ण शहर अक्षरश: कचरामय झाले आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण देखील वाढले आहे. महापालिकेच्या सभागृह स्पष्ट बहुमत असून सत्ताधारी भाजपला सभागृह चालवणे अवघड झाले आहे. वारंवार सभा तहकूबीचे प्रकार घडत आहेत. जुना-नवा वाद, ‘याची जिरवं आणि त्याची जिरव’ यातचं भाजपाची तीन वर्षे गेली आहेत. राष्ट्रवादीने भूमिपूजन केलेली कामेचं भाजपाकडून मार्गी लागत आहेत. भाजपाने एकही वेगळं असं काम केलं नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी केवळ निविदा काढणे आणि टक्केवारी मिळवणे यातच ‘गुंग’ असल्याचा आरोप विरोधक जाहिरपणे करत आहेत.
दरम्यान, गेल्या ३ वर्षात महापालिकेत ‘पारदर्शक’ कारभार केला असल्याचा दावा भाजपकडून होत आहे. कारभारी लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्याकडून शहराच्या सर्वांगिण विकासावर भर दिल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या काळात महापालिकेत सुरू असलेली ठेकेदारांची ‘मक्तेदारी’ भाजपाने मोडीत काढल्याचा दावा केलायं. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी बीआरटी बरोबरच मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले अाहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचे नियोजन भाजपाकडून करण्यात आले आहे. केंद्राच्या स्मार्टसिटी योजनेत पिंपरी चिंचवड शहराचा समावेश करून घेतला असून पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव परिसरात त्याअनुषंगाने कामे प्रगतीपथावर आहेत. चऱ्होली, मोशी, डुडूळगाव आदी समाविष्ठ भागांचा विकास गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर झाला असून डी.पी. रस्ते विकसीत केले जात असल्याचा दावा आमदार महेश लांडगे यांनी केलायं. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यात पाण्याची समस्या उद्भवू नये म्हणून रावेत येथील जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. तर भामा-आसखेड मधून देखील पाणी घेण्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरूळीत व्हावी म्हणून उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आदींवर भर दिला असल्याचा दावा भाजपचे कारभारी करत आहेत.