पिंपरी (Pclive7.com):- ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील कोकण भागासह विविध जिल्ह्याचे वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठी आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषीमंत्री नरेंदसिंह तोमर यांना पत्र पाठविले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, निसर्ग चक्रीवादळामुळे देशभरातील विविध राज्यातील मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातीलही नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळ रायगडला धडकले होते. त्यामुळे कोकण परिसरातीलही संप्पतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळ तासी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाहत होते. या वादळामुळे विद्युत पोल, झाडे उन्मळून पडली आहेत. रायगड जिल्ह्यातील अनेक घरांवरील पत्रे हवेत उडून गेली आहेत.
माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पुणे आणि रायगड जिल्ह्याला वादळाचा मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत, खालापूर, पनवेल तालुक्यातील अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. शेतक-यांची पिके पुर्णत: उधवस्त झाली आहेत. वादळामुळे राज्यातील किनारपट्टी लगतच्या अनेक जिल्ह्यांची हीच अवस्था झाली आहे. प्रचंड झालेले नुकसान पाहता महाराष्ट्राला मोठी आर्थिक मदत करावी अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.