पिंपरी (Pclive7.com):- मागील विधानसभा निवडणूकीत पिंपरीमध्ये दोन गटात भांडणे झाली होती. त्यावेळी परस्पर विरोधी गुन्हे पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. याचा तपास पिंपरी पोलिसांकडून काढून सीआयडीकडे द्यावा. तसेच पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई व सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव यांची बदली करावी. अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी (दि.२५ ऑगस्ट) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी दिले आहे.
याबाबत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आसवानी यांनी सांगितले की, आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून या घटनेची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर गृहमंत्री यांनी या गुन्ह्याचे फेर तपासाचे आदेश देऊ तसेच संबंधित तपास अधिका-याकडून तपास दुस-या अधिका-याकडे देऊ असे आश्वासन आसवानी यांना दिले. 2019 विधानसभा निवडणूकीच्या दिवशी पिंपरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नं.1091/2019 दिनांक 21/10/2019 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांनी जबाब देताना चार जणांनी मारहाण केल्याचे नमुद केले होते.
परंतू चार्जशिट दाखल करताना पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई व सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव यांनी आसवानी कुटूंबियांतील अकरा व इतर नातेवाईक चार व्यक्तींची नावे त्यात दाखल केली आहेत. यामध्ये माझे थोरले बंधू राजू आसवानी तसेच धनराज आसवानी हे आजारपणामुळे घरातून बाहेरही जात नाहीत. त्यांची देखील नावे तपास अधिका-यांनी चार्जशीटमध्ये दाखल केली आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त हे बेकायदेशीर धंदे करणा-यांना पाठीशी घालत आहेत, तसेच बांधकाम व्यावसायीकांकडून हप्ते घेत असतात. त्यासाठी त्यांनी निलंबित पोलिस नेमला आहे. त्यांच्या काळात पिंपरी चिंचवडचा ‘युपी’, ‘बिहार’ झाला आहे.
या घटनेतील तपासाबाबत एकतर्फी निर्णय घेणा-या पोलिस आयुक्त व सहाय्यक आयुक्तांची पुणे जिल्ह्यातून बदली करावी. अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी दिले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी असेही पत्र संबंधित विभागात दिले आहे. याबाबत आसवानी कुटूंबियांवरील अन्याय दुर झाला नाही तर वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाऊ असेही आसवानी यांनी सांगितले.























Join Our Whatsapp Group