वडगाव मावळ (Pclive7.com):- मावळ मतदारसंघातील जलसंपदा विभागाकडील मंजूर असलेली; परंतु वर्षभरापासून कोणतीही कार्यवाही न झालेली कामे १० जुलैपर्यंत मार्गी लावावी अन्यथा पवना धरणातून सोडण्यात येणारे पाणी अडविण्यात येईल, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.
याबाबत, आमदार शेळके यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना पत्राद्वारे इशारा दिला आहे. मावळ मतदारसंघातील डोणे, आढले बु., आढले खुर्द, दिवड, राजेवाडी, ओवळे व चांदखेड अशा सात गावांसाठी पवना नदीवरुन उपसासिंचन राबविणे व मावळ तालुक्यातील नद्यांवर विविध ठिकाणी घाट बांधण्याबाबत मंजुरी मिळाली असून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या असतानाही त्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घालून मावळ मतदारसंघातील कामे त्वरित मार्गी लावण्याच्या तसेच पवना व इंद्रायणी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व त्यावरील पूल बांधणे व दुरुस्ती करणेसाठी एका वर्षापूर्वी सूचना दिल्या आहेत, तरी अजून टेंडरही काढण्यात आलेले नाही.
याशिवाय, पवना प्रकल्पामुळे बाधित झालेल्या उर्वरित ८६३ प्रकल्पग्रस्तांना जमिनी वाटप करण्याबाबत शेळके यांनी अनेकदा पाटबंधारे मंडळाकडे पाठपुरावा केला आहे. तरीही पाटबंधारे मंडळाकडून कामे चालू करण्याच्या दृष्टीने अद्याप काहीच हालचाल केलेली नाही.
मावळ मतदारसंघातील कामांमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप शेळके यांनी केला. मंजूर झालेली सर्व कामे १० जुलैपर्यंत मार्गी लावावी, अन्यथा पवना प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती व ग्रामस्थ यांच्यामार्फत पवना धरणाच्या खालील बाजूस जनआंदोलन करून धरणातून सोडण्यात येणारे पाणी अडविण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.