वारकरी सांप्रदाय, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने पिंपरीत आंदोलन
पिंपरी (Pclive7.com):- भारतामध्ये यापुर्वी कॉलरा महामारीची साथ आली होती. तेंव्हा देखिल तत्कालीन सरकारने पालखी सोहळ्यावर एवढी बंधने घातली नव्हती. परंतू महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातशे वर्षांची परंपरा असणा-या पालखी सोहळ्यावर जाचक नियम – अटी घातल्या आहेत. हे निर्बंध उठवून हभप बंडातात्या कराडकर आणि इतर वारक-यांना नजरकैदेतून मुक्त करावे अशी मागणी वारकरी सांप्रदायाची आहे अशी प्रतिक्रिया हभप मनोहर बुवा सुभेकर यांनी दिली.
पालखी सोहळ्यात वारक-यांनी सहभागी होण्याविषयी राज्य सरकारने जाचक अटी घातल्या आहेत आणि हभप बंडातात्या कारडकर यांना पोलिसांनी स्थानबध्द केले आहे. याचा निषेध करण्यासाठी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात टाळ वाजवून वारक-यांनी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिका-यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा जयघोष करीत आंदोलन केले.
या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे चिंचवड जिल्हा सहमंत्री धनंजय गावडे, चिंचवड अध्यक्ष शरद इनामदार, विभागमंत्री नितीन वाटकर, बजरंग दलाचे कुणाल साठे, जिल्हा मंत्री संजय शेळके, कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, हभप शिवाजी महाराज इंगळे तसेच अभिजीत शिंदे, नाना सावंत, संभाजी बालघरे, सागर चव्हाण, नंदकुमार कुलकर्णी, अमोल नाणेकर, ओंमकार कुंभार, प्रज्ञा सावंत, भक्ती साळवी आदींनी सहभाग घेतला होता.
विश्व हिंदू परिषदेचे चिंचवड जिल्हा सहमंत्री धनंजय गावडे म्हणाले की, या सरकारने कोरोनाच्या नावाखाली पालखी सोहळ्यात सहभागी होणा-या वारक-यांवर कडक निर्बंध घातले. तसेच स्वतंत्रपणे वारी करणा-या वारक-यांच्या खांद्यावरील भगवी पताका, डोक्यावरील टोपी काढून घेतली. हे अन्यायकारक असून त्याचा वारकरी सांप्रदायाबरोबरच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जाहिर निषेध करीत आहेत.