जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठामध्ये ग्रंथालयाचे लोकार्पण
पिंपरी (Pclive7.com):- ग्रंथांचे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे स्थान आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे स्थान आपल्या भारतीयांच्या आयुष्यात परमोच्च असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक पद्माकर बोन्डाले यांनी केले.
जगतगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे (दि.१२) ग्रंथालयाचे लोकार्पण संत साहित्याचे गाढे अभ्यासक पद्माकर बोन्डाले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या ‘भोसरी व्हीजन- २०२०’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथे मूल्यशिक्षणाबरोबर संत साहित्याची माहिती आणि संतांचे विचार विद्यार्थ्यासह समाजापर्यंत पोहचावेत या हेतूने संतपीठ उभारण्यात आले आहे. संतपीठामध्ये रविवारी ग्रंथालयाचे उद्घाटन संत साहित्याचे गाढे अभ्यासक पद्माकर बोन्डाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, संतपीठाचे अभ्यासक व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, संत साहित्याचे अभ्यासक, वाणीभूषण ह. भ. प. प्रमोद महाराज जगताप, संतठापीचे संचालक राजू महाराज ढोरे, संतपीठाच्या संचालिका स्वाती मुळे, बालभारतीचे अभ्यासक प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे तसेच संतपीठाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
पद्माकर बोन्डाले यांनी संत साहित्याचे विचार मांडत असताना ग्रंथांचे व्यक्तीच्या आयुष्यातील किती महत्वाचे स्थान असते हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत आदी ग्रंथांचे दाखले देत पटवून दिले.
संत तुकाराम महाराजांची गाथा ही पंचम वेद असल्याचे सांगत संत व ग्रंथ हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत असे प्रतिपादन संतपीठाचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंदजी मोरे यांनी केले.
ग्रंथांच्या माध्यमातून मिळणारे शब्द ज्ञान आणि संतांच्या बोधाद्वारे मिळणारे मूल्यसंस्कार हे जीवनामध्ये समन्व्यय घालून देण्यासाठी संतपीठाचा हा उपक्रम आरंभलेला आहे असे मत संतपीठाचे अभ्यासक व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभयजी टिळक यांनी व्यक्त केले.
आज ग्रंथांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सरस्वतीच याठिकाणी अवतरली तसेच इंटरनेटच्या माध्यमातून फक्त माहिती मिळू शकते परंतु यांच्या माध्यमातून परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते असे मत संत साहित्याचे अभ्यासक, वाणीभूषण ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकात संतपीठाच्या संचालिका स्वाती मुळे यांनी संतपीठाच्या शिक्षण पद्धतीची माहिती दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे यांनी तर आभार प्रदर्शन संतपीठाचे संचालक राजू महाराज ढोरे यांनी केले.