पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांवर लादेलेला ‘दिवसाआड’ पाणी पुरवठा १ नोव्हेंबर पासून नियमित करा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा करा अन्यथा आम्ही आपल्या पध्दतीने पाणी देण्यास भाग पाडू असा इशारा मनसेच्यावतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.
मनसेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत शहरसचिव रुपेश पटेकर, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, शहर सचिव सिमा बेलापुरकर, उपशहर अध्यक्ष संगीता देशमुख, अनिता पांचाळ, विद्यार्थी सेना शहर संघटक श्रद्धा देशमुख उपस्थित होते.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यावेळी शहरवासियांना केवळ सहा महिने हा त्रास असेल, त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास दोन वर्षांपासून ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर आहे.
कोरोना काळात देखील शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरलेले असताना प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात देखील या धोरणात पालिकेकडून शिथिलता दिली जात नाही.
आंद्रा व भामा आसखेड धरणाच्या पाण्याचे गाजर अजून किती दिवस लोकांना दाखवणार आहात? नागरिकांची दररोज पाणी देण्याची मागणी वाढत आहे. १ नोव्हेंबरपासून शहरात सर्वत्रच टप्पाटप्प्याने नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी आपण आयुक्त या नात्याने पुढाकार घ्यावा. नागरिकांना नियमित पाणी देऊन दिलासा द्याल, अशी अपेक्षा करतो. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने पाणी देण्यास भाग पाडेल असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.