पिंपरी (Pclive7.com):- राजकारण म्हटलं की आरोप-प्रत्यारोप, आंदोलन, उपोषण आणि समर्थन- विरोध आलाच. पण, महाराष्ट्रातील राजकारणाची विशिष्ट संस्कृती आहे. या संस्कृतीला गालबोट लावलं जातंय, अशी खंत दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलीय. पण, त्याच पवारांचे कायकर्ते पिंपरी-चिंचवडमध्ये पातळी सोडून वर्तन करीत आहेत. राज्यभरात पिंपरी-चिंचवडकरांची मान शरमेनं झुकावी, असा प्रकार घडलाय. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर चप्पल भिरकावली. बांगड्या फेकल्या, ही बाब सुसंस्कृत पिंपरी-चिंचवडला शोभणारी नाही.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220220-WA0007-300x300.jpg)
मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले. व्यासपीठावर सर्वपक्षीय मंत्री, नेते उपस्थित होते. पुण्यातील समारंभ यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमानंतर फडणवीस पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आले. ८ ते १० ठिकाणी विविध विकासकामांची उद्घाटने पार पडली. मात्र, शाहुनगर- पुर्णानगरच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन केले. राडा केला. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आंदोलनातील एकाने फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली. बांगड्या फेकल्या. संपूर्ण राज्यात ही बातमी पसरली. पिंपरी-चिंचवडची मान शरमेनं झुकली.
काही दिवसांपूर्वी पोलीसांचा एक अहवाल समोर आला. राष्ट्रवादीतील एकूण ३६ नगरसेवकांपैकी १९ जणांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. आता संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन कारवाई होणार की, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून ‘सॉफ्टकॉर्नर’दिला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीने आंदोलन शाहुनगर-पुर्णानगरमध्येच का केले? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादी ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी महापौर मंगला कदम या प्रभागातून प्रतिनिधीत्व करतात. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी कदम यांनी याचप्रकारे विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळे करुन अजित पवार यांना निमंत्रित केले होते. मात्र, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी गेल्या ५ वर्षांत विकासकामांचा धडाका लावला. त्याचे श्रेय पवार यांना मिळाल्यास कदम यांना राजकीय फटका बसणार आहे. या भितीमुळे मंगला कदम यांच्या मागणीनुसार आणि माजी महापौर योगेश बहल यांच्या सूचनेनुसार शाहुनगर-पुर्णानगरला आंदोलन निश्चित करण्यात आले.
नियोजबद्ध ‘कट’तयार करण्यात आला. आंदोलनात भ्रष्टाचार-भ्रष्टाचार असे नारे देण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीने ज्यांच्या विरोधात नारे दिले. त्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात एखादा आरोपही सिद्ध झालेला नाही. ‘स्वच्छ प्रतिमा’ असलेल्या फडणवीस यांना लक्ष्य करीत राष्ट्रवादीने आंदोलन करुन पिंपरी-चिंचवडची अब्रु वेशीला टांगली आहे.
गेल्या पाच वर्षांत निद्रितावस्थेत असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर जाग येते. रस्त्यावर उतरावे लागले. ज्यांनी महापालिका सभागृहात महत्त्वाची पदे भूषवली. त्यांना निवडणुकीसाठी आंदोलन करावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून २०-२५ वर्षे सत्ता भोगली. शहरात स्थिर-स्थावर किंबहूना करोडपती झाले. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी प्रतिकूल परिस्थितीत असताना पाठ फिरवली. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताचा विचार आला असेल, तर राष्ट्रवादीने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असेच म्हणावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह महाविकास आघाडीचे डझनभर मंत्री भ्रष्टाचार आणि अन्य गैरव्यवहारामध्ये गुंतलेले आहेत. असे असताना भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करुन फडणवीस यांच्या ताफ्यावर चप्पल भिरकावून आणि आंदोलन करुन राष्ट्रवादीचे पदाधिकारी कशाचे समर्थन करताहेत? भ्रष्टाचार हा राष्ट्रवादीसाठी निवडणुकीचा मुद्दा होवू शकत नाही. चप्पल फेकीप्रकरणी पोलीस कारवाई करतीलच, पण अजित पवारसुद्धा अशा प्रवृत्तीचे समर्थन करणार नाहीत, अशीच पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा आहे.