पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. विठ्ठल. विठाई. विठुराया. नाव कोणतेही घ्या, भावना एकच माहेर.. सकल संतांचं माहेर म्हणजे पंढरपूर. पंढरी. आणि या पंढरीत येणारा भक्त म्हणजे वारकरी. वारकरी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो भागवत धर्म. या भागवत धर्माचा पाया सातशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी रचला आणि साडेतीनशे वर्षांपूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी त्यावर कळस चढविला. याबाबतचे वर्णन संत तुकाराम महाराजांच्या समकालीन व त्यांच्या नंतरच्या संतांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये दिसते.
संत तुकाराम महाराज यांचे बंधू कान्होबा असतील किंवा संत तुकाराम महाराज यांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज असतील, यांच्या अभंग रचनांमध्ये सुद्धा भागवत धर्माचे वर्णन आढळते. या भागवत धर्माचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी आळंदी आणि संत तुकाराम महाराज यांची कर्मभूमी देहू. ही दोन्ही तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली आहेत. आणि याच इंद्रायणी नदीमुळे उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची उत्तर सीमा निश्चित झाली आहे. ही दोन्ही तीर्थक्षेत्रे पिंपरी चिंचवडच्या उत्तर सीमेच्या ईशान्य व वायव्य दिशेस आहेत. त्यांना जोडणारा देहू-आळंदी रस्ता पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख मार्ग आहे. याच मार्गावरील एक गाव म्हणजे चिखली.
पिंपरी-चिंचवडचे एक उपनगर. त्यालाच टाळगाव चिखली असेही म्हणतात. कारण, संत तुकाराम महाराज देहू येथून आकाश मार्गे वैकुंठाला गेले. त्यावेळी त्यांच्या हातातील टाळ चिखली गावात पडले. म्हणून या गावाला टाळगाव चिखली असे म्हटले जाते. गावातील टाळ मंदिर हे या घटनेचे प्रमाण आहे. इतके महत्त्व चिखली गावाला आहे. हे महत्व ओळखूनच महानगरपालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी चिखली येथे संतपीठ उभारण्याचा प्रस्ताव दहा वर्षांपूर्वी ठेवला. पण, महानगरपालिकेतील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. आणि प्रस्ताव रखडला. २०१७ मध्ये महानगरपालिकेत सत्तांतर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता आली. आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
२०१७ नंतर
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची २०१७ ची निवडणूक भारतीय जनता पक्षाने आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढली. पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता आली. आणि चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्याच्या कामाला गती मिळाली. गेल्या वर्षीपासून संतपीठाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामध्ये चार वर्षांचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. यंदाचे दुसरे वर्ष आहे. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड च्या वैभवात भर पडली आहे.
कारण, पिंपरी-चिंचवडचा समावेश देहू-आळंदीच्या पंचक्रोशीत आहे. या भागाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. विद्यार्थ्यांना ऐच्छिक शिक्षणाबरोबरच पारंपरिक सांप्रदायिक शिक्षण मिळण्याच्या हेतूने संत विद्यापीठ स्थापन केले आहे. कारण, चिखली ही जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे सोनवणे वस्ती येथे संतपीठाचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये वादन, गायन, किर्तन आणि प्रवचन यांसारख्या सांप्रदायिक परंपरेचे शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) चार वर्षांचा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. संतपीठ उभारण्यासाठी ज्येष्ठ अभ्यासक किर्तनकारांचे आणि वारकरी शिक्षण संस्थेतील मान्यवरांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.
असा आहे अभ्यासक्रम
चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठातील चार वर्षांच्या अभ्यासक्रमांमध्ये पहिल्या वर्षी मराठी व्याकरण, श्रीमद्भगवतगीता, गाथा, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी अध्याय व ओव्या आणि वारकरी भजन, दुसऱ्या वर्षी विचारसागर, संपूर्ण गीता, ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय व ओवी, भजनसंग्रहातील वाराचे व जन्माचे संपूर्ण अभंग, तिसऱ्या वर्षी सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय, पंचदशी, ज्ञानेश्वरीतील १५ वा अध्याय, भजनसंग्रहातील नाटाचे अभंग आणि चौथ्या वर्षी ज्ञानेश्वरी अध्याय १३ ते १८, पंचदशी, ज्ञानेश्वरी पाचवा व सातवा अध्याय, गाथेतील संतपर प्रकरणांचे पाठांतर आणि आठवड्यातून तीन दिवस किर्तन शिकविले जाणार आहे.
भागवत धर्मातील वादन, गायन, कीर्तन, प्रवचन आदी कला अवगत करण्यासाठी आणि नव्या पिढीला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा हेतू ठेवून महानगरपालिकेकडून संतपीठाची रचना करण्यात आली आहे. संतपीठ समितीचे अध्यक्षपद महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, निवृत्त उपजिल्हाधिकारी तानाजी शिंदे, धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते राजू ढोरे, सल्लागार स्वाती मुळे यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.